________________
-५ वा.] असफउद्दौला. कॉर्नवालिस ह्यांनी मागील गव्हरनर जनरल ह्यांच्या जुलमामुळे अयोध्येची जी दुर्धर स्थिति झाली होती ती सुधारण्यास नबाब असफउद्दौला ह्यास बरीच मोकळीक करून दिली ह्यांत शंका नाही. नबाब असफउद्दौला ह्यास लॉर्ड कॉर्नवालिस ह्यांच्याकडून उत्तेजन मिळतांच त्याने अयोध्येची स्थिति सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु एक तपपर्यंत एकसारखी झालेली अव्यवस्था अल्पकाळांत दूर करणे त्यास सुसाध्य नव्हते. त्यांतून तो विशेष कर्तव्यदक्ष व राजकारस्थानपटु नसल्यामुळे त्यास अधिकारी लोकांचे जुलम एकदम बंद करणे शक्य नव्हते. तथापि त्याने राज्यकारभाराकडे बरेच लक्ष्य घातले व आपल्याकडून होईल तितका चांगला यत्न केला. त्याने महाराज टिकायतराय नांवाचा एक चतुर मुत्सद्दी आपला खाजगी दिवाण करून त्यास संस्थानच्या अंतर्गत सुधारणेची कामगिरी सांगितली. महाराज टिकायतराय हा एक कायस्थ जातीचा हिंदु असून असफउद्दौल्याच्या दरबारांत फार प्रतिष्ठा पावला होता. हा फार उदार, दीनवत्सल व धर्माभिमानी असा पुरुष होता. ह्याने लखनौ येथे चांगली सुधारणा करून 'टिकायत गंज' व 'टिकायत राय बाजार' वसविला. त्याचप्रमाणे ह्याने आपल्या नांवानें 'टिकायत गंज' व 'टिकायत नगर' अशी दोन गांवें बाराबंकी जिल्ह्यामध्ये वसविली. ह्याने बांधलेला एक घांट काशी येथे प्रसिद्ध आहे. हा सद्गृहस्थ इ० स० १८०० मध्ये मृत्यु पावला. टिकायतरायाप्रमाणे महाराज झौलाल म्हणून एक दुसरा हिंदु मुत्सद्दी असफउद्दौल्याचा कोशाध्यक्ष होता. हाही फार प्रसिद्ध पुरुष असून त्याच्या नांवानें लखनौ येथील वजीरगंजामध्ये "झौलाल" नांवाचा बाजार अद्यापि चालत आहे. अशा रीतीने दोन प्रसिद्ध हिंदु मुत्सद्दी आपल्या दरबारांत घेऊन असफउद्दौल्याने अयोध्येची सुधारणा कर