पान:अभिवादन (Abhivadan).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४ । अभिवादन

तरित असून दर ९ ओव्यांत भाषांतरित २ ओव्या येतात. मोरोपंतात भाषांतरे ११८० असून दर ५ आर्यांत भाषांतरित १ आर्या हे प्रमाण येते. म्हणजे सुमारे भाग भाषांतरित व भाग दोघांच्याही काव्यांत स्वतंत्र असा आहे. ही गणना करताना अगदी थोडासुद्धा भाषांतराचा वास ज्या ओवीला अगर आर्येला येईल तिचे परिगणन होऊन गेले आहे. या भागातही प्रायः भाषांतरित भाग कथानकविषयक आहे. कल्पनाविलास आणि रस यांचा भाग सामान्यपणे स्वतंत्र आहे. हा सर्व पुरावा पुढे ठेवून नांदापूरकरांनी उभय कवींना 'भाषांत-ये' या आरोपातून मुक्त केले आहे.
 अण्णांचा अभ्यास चीरस असे. भाषांतराचा प्रश्न एकदा उपस्थित होताच त्यांनी तो शेवटाला नेऊन भिडवला आहे. दोन्ही कवींचे कार्य स्वतंत्र आहे इतके सांगून त्यांना समाधान होत नाही. जी भाषांतरे आहेत त्यांत मुक्तेश्वरांत भाषांतरित भाग अधिक आहे हेही ते सांगतात. हे सारे प्रतिपादन थोडेसे वकिली थाटाचे नाही काय ? एक तर मुक्त-मयूर दोघेही स्वतंत्र कवी आहेत. भाषांतरेच म्हणाल तर एकटया मोरोपंतांनी केली नसून मुक्तेश्वरांनीही केली आहेत. त्यातही असेलच भापांतऱ्या, तर मुक्तेश्वर जास्त आहेत. शिवाय मुक्तेश्वरी भाषांतर कसे प्रांमादिक आहे हे दाखवून पंतांचे भाषांतर कसे प्रामाणिक आहे हेही अण्णा दाखवतात. म्हणजे मुक्तेश्वरात भाषांतरित भाग जरी जास्त असला तरी भाषांतरात प्रामाणिकपणा अगदी कमी आहे हे सांगितल्याविना त्यांना राहवत नाही. एकेका विषयाची आणि त्याच्या पागोन्याची बारीकसारीक पिंजण करून आपले विश्लेषण शेवटापर्यंत नेण्याचा अण्णांचा प्रयत्न सर्वांगीण अभ्यास म्हणून थक्क करणारा आहे. पण त्यामुळे विस्कळितपणा वाढतो हेही खरे आहे.
  मुक्त-मयूर उभय प्राकृतकवी स्वतंत्र कवी आहेत हे सिद्ध करण्यासाठी नांदापूरकरांनी अजून एक मार्ग स्वीकारला आहे. मूळ महाभारतातील कथानक ७२० अध्यायांचे आहे. मुक्तेश्वरांनी ते ९७ अध्यायांत आणले आहे. आणि मोरोपंतांनी ते ७३ अध्यायांत आणले आहे. इकडे बोट दाखवून नांदापूरकर म्हणतात, उभय मराठी कवींनी आपल्या अध्यायांचे आरंभ व शेवट स्वतंत्र केले आहेत. कथानकाचा कोणता भाग कोणत्या अध्यायात घ्यायचा हे स्वतंत्ररीत्या ठरविले आहे. हे ठरवताना मूळ महाभारतातील उपपर्वांचे बंधन त्यांनी पाळलेले नाही. अशा रीतीने बाह्याकारात मराठी कवींचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. शिवाय त्यांनी मूळ कथानकात आपला भर जागोजाग बदलला आहे. शंतनू आणि गंगा यांचा प्रसंग या दृष्टीने पाहण्याजोगा आहे. महाभारतातील शंतनू गंगेची कामोपभोगार्थ इच्छा करतो मुक्तेश्वरांच्या शंतनूचे मन तिला पाहून पतंग होते. मोरोपंतांचा शंतनू, उमेकडे जसा शंकर आकृष्ट झाला तसा आकृष्ट होतो. मुळात व्यासांनी गंगा व शंतनू