पान:अभिवादन (Abhivadan).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । १३

वतो हे मान्य केलेच पाहिजे. अशा प्रकारे नांदापूरकरांच्या प्रबंधाविषयी मतभेदाचे अनेक दुवे दाखविता येतील. पण मूलग्राही आणि दिशा निर्माण करणारे संशोधन असेच वादग्रस्त असते त्याला इलाज नाही.
 मुक्तेश्वर आणि मोरोपंत या दोन मराठी कवींनी आपापल्या महाभारताची जी रचना केली आहे तिचा तौलनिक अभ्यास करताना पहिला प्रश्न, ही स्वतंत्र काव्ये गृहीत धरावीत काय हाच निर्माण होतो. इंग्रज अमदानीपूर्व मराठी वाङमयाला महानुभावीयांचे काही सन्माननीय अपवाद वगळता सर्वत्र संस्कृतचाच आधार असतो. संस्कृत तात्त्विक ग्रंथावर सविस्तर मर्मोद्घाटक टीका अगर संस्कृत पुराणग्रंथांतील व महाकाव्यांतील विविध कथानकेच मराठी कवींनी आपापल्या काव्यग्रंथांना आधार म्हणून निवडली. यामुळे सर्व मराठी कवींवर परभृततेचा सरसहा आरोप काही टीकाकारांनी केला आहे. मुक्तेश्वर-मोरोपंतांपुरता नांदापूरकरांनी या प्रश्नाचा विचार करून मुक्त-मयूरांची महाभारते स्वतंत्र काव्यग्रंथ आहेत, असा आपला अभिप्राय नमूद केला आहे. ५, ६ व ७ वा असे तीन उन्मेष या चर्चेसाठी त्यांनी वाहिले आहेत. त्यांच्या मते जगातील बहुतेक श्रेष्ठ कवींनी आपापल्या काव्याची कथानके, प्राचीन महाकाव्ये, लोककथा व दंतकथा यांतून घेतली आहेत. पण केवळ कथानक दुसरीकडून घेतले म्हणून काही त्यांना कुणी भाषांतरे म्हणत नाही. विषयाची मांडणी, कल्पनाविलास, रसवत्ता, स्वभावरेखन इ. बाबतीत नावीन्य दाखवून आपली स्वतंत्र प्रतिमा त्यांनी प्रस्थापित केली आहे. मुक्तेश्वर आणि मोरोपंत यांच्याही बाबतीत हाच नियम लागू केला पाहिजे. काही टीकाकारांनी मूळ महाभारताशी तुलना करून मुक्तेश्वरांचे स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मोरोपंत मात्र भाषांतये ही भूमिका ठेवली आहे. प्रा. बनहट्टींच्या सारखे मोरोपंताभिमानी टीकाकारसुद्धा आर्याभारताला भाषांतरच मानतात. मात्र हे भाषांतर विषयाशी तद्रूप होऊन केलेले असल्यामुळे त्याला स्वतंत्र काव्याचा दर्जा प्राप्त झाला आहे असे त्यांना वाटते. नांदापूरकरांनी ही सारीच भूमिका तपासून पाहिली आहे. त्यांच्या मते आदि, सभा, वन, विराट आणि सौप्तिक या पाच पर्वांत मिळून मूळ महाभारताचे २६१५० श्लोक येतात. सदरहू पाच पर्वांत मिळून मुक्तेश्वराच्या १४०६२ व मोरोपंतांच्या ५७७८ ओव्या व आर्या येतात. संस्कृत श्लोक जसाच्या तसा मराठीत आणावयाचा असल्यास संस्कृतपेक्षा जास्त शब्दांनी तो अर्थ व्यक्त करावा लागतो हे ध्यानात घेतल्यास जर आमचे कवी केवळ भाषांतचे असते तर त्यांची ग्रंथसंख्या भारतापेक्षा अधिक झाली असती.
 अजून जास्त तपशिलात जाऊन नांदापूरकरांनी प्रत्येकाच्या काव्यात असणारे भाषांतराचे प्रमाण मोजून काढले आहे. मुक्तेश्वरात एकूण ३१०० ओव्या भाषां