पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाढविण्याकरिता करणे अनुचित आहे असा स्पष्ट निर्णय न्यायालयाने दिला.
 भारतात सध्यातरी खेळांच्या मैदानांवर हा प्रश्न उभा राहिलेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांचा एकदिवसीय क्रिकेटचा सामना असला म्हणजे वातावरण मोठे तंग असते. अगदी जिंकू किंवा मरू अशा कसोशीने सामना खेळला जातो. लांबवरून प्रवास करून, महागडी खर्चीक तिकिटे काढून प्रेक्षक जमतात. आपल्या बाजूची सरशी झाली म्हणजे आनंदप्रदर्शनाचा धिंगाणा घालतात आणि दुसऱ्या पक्षाचा पाणउतारा हरेक प्रकारे करतात. पण, सचिन किंवा सौरभने षटकार मारला म्हणजे 'हर हर महादेव किंवा जय बजरंग बली' अशा घोषणा होत नाहीत किंवा जावेद अख्तरने कोणाची दांडी उडविली म्हणजे 'अल्लाऽ हो अकबर' किंवा 'इल् इलाहिया रसूऽलल्ला' अशा गर्जना होत नाहीत. तशा त्या होऊ लागल्या तर त्यांवर बंदी घालण्यात येईल, हे उघड आहे; पण साऱ्या देशाच्या क्रीडाक्षेत्रात कोणताही सामना चालू नसताना विविध धर्मांच्या प्रार्थनांची, केवळ आवाज चढवून लोकांचे लक्ष वेधून आपले अस्तित्व जाहीर करण्याची सकाळसंध्याकाळ जी स्पर्धा चालू आहे त्याबाबत प्रकरण न्यायालयात जाईल किंवा त्याबाबत काही निर्णय होईल अशी शक्यता काही दिसत नाही. उलट, शाळांमध्ये प्रार्थना म्हटल्या जाव्यात, पाठ्यपुस्तकांत धर्मशिक्षणाचा अधिकाधिक प्रभाव असावा या दृष्टीने फर्माने सुटत आहेत.
 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्या भेटीच्या काळात भारत आणि अमेरिका दोघेही लोकतंत्रवादी देश, दोघेही अतिरेकी चळवळींच्या विरोधात, दोघेही आधुनिक युगातील गणकयंत्राच्या तंत्रज्ञानात आघाडीवर अशी मोठी भलावण झाली. दोन्ही देशांत समानता विपुल आहे, त्याचबरोबर दोघांत फरकही आहेत. भविष्यकाळात समान गुण महत्त्वाचे ठरतात का दोघांतील फरकाचे विषय? कोणी सांगावे?

■ ■

अन्वयार्थ – दोन / ३१