पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





घटना


 १४ एप्रिल म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. बाबासाहेबांचे अनुयायी दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यंदा उत्साहाला विशेष उधाण आले होते. गावागावात आणि त्याहूनही शहरातील वस्त्यावस्त्यांतून सभा होत होत्या, घोषणा होत होत्या. या वर्षीचा विषय थोडा वेगळा. भारतीय जनता पक्षाने सर्व घटनेची फेरतपासणी करण्यासाठी एक समिती नेमली. त्याला अनेकांचा विरोध झाला. स्वतः राष्ट्रपतींनीही गेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केलेल्या भाषणात घटना कमी पडली यापेक्षा आपण कमी पडतो अशी भूमिका घेतली. राष्ट्रपती सहसा मंत्रिमंडळाने लिहून दिलेले भाषण वाचतात. राष्ट्रपतींनी या वेळेस हा संकेत मोडून शासनाच्या अधिकृत धोरणाविरुद्ध जाहीर भूमिका घेतली. वाजपेयी शासनाने आपली भूमिका सोडली नाही. घटना पुनर्रचना समितीची जुळवाजुळव होऊ लागली.
 घटनेची पुनर्रचना करणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाकृतीस धक्का लावणे अशी दलित नेत्यांनी त्यांच्या अनुयायांची समज करून दिली आहे आणि तेही बिचारे, सनातनी कर्मठ ब्राह्मणांच्या पोथीनिष्ठ आवेशाने घटनेत शब्दाचादेखील बदल झाला तर तो बाबासाहेबांच्या स्मृतीचा अनादर केल्यासारखे होईल, असे मोठ्या पोटतिडकीने मांडू लागले कालची बाबासाहेबांची पुण्यतिथी या विषयानेच गाजली.

 विरोधी पक्षाच्या नेत्या आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनीही १४ एप्रिलचा मुहूर्त साधून नागपूर येथे चैत्यभूमीवर जाहीर मेळावा घेतला. घटनेची पुनर्रचना करण्याच्या योजनेला त्यांनी विरोध केला. योजनेवर कडाडून हल्ला केला, एवढेच नाही तर, बाबासाहेबांचे वारंवार नाव घेऊन, त्यांचा अपमान करण्यासाठीच केवळ घटनेची पुनर्रचना करण्याचे सरकारने

अन्वयार्थ - दोन / ३२