पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/231

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



सीता वनवासीच आहे अजून


 राठी दुसरीत असताना वडिलांची बदली बेळगावहून नाशिक येथे झाली. गुरुजींना सांगितले, 'मी शाळा सोडणार' त्यात आनंद किंवा अभिमान वाटण्याचे काय कारण? पण वाटला एवढे खरे. गुरुजींनीच विचारले, 'कोठे जाणार?' बेळगावातल्या बेळगावात दुसऱ्या शाळेत जात नाही हे कळून त्यांना समाधान वाटलेसे दिसले. नाशिकला जाणार का? मग, तुम्हाला आता द्राक्षे टोपलीटोपलीने खायला मिळणार!' ते म्हणाले. बेळगावात आंबे, फणस, काजू इत्यादी फळांची अगदी रेलचेल असे. पण, द्राक्षाची मोठी नवलाई होती. माझ्या तोंडालाही मेव्याच्या कल्पनेने पाणी सुटले. शाळूमित्रांना मोठा हेवा वाटला.
 घरी आल्यावर आईने सांगितले, 'राम जेथे वनवासात गेला होता त्या गावी आपण चाललो आहोत. तेथे रामाची मोठी मंदिरे आहेत, सीतेचे जेथून रावणाने अपहरण केले ती गुंफा आहे. रामदासांनी तेथेच जपतप केले.' एवढी सगळी प्रवासी माहिती सांगण्याचे कारण, 'तेथे गेल्यावर बेळगावसारखी दंगामस्ती चालणार नाही, रामलक्ष्मणासारखे वागावे लागेल' हा इशारा.
 त्या काळचे जुने नाशिक आणि त्यातल्या त्यात पंचवटीचा भाग खरोखरीच राममय होता. वर्गाची सहल पंचवटीला गेली. सीतागुंफा पाहिली. एकाखाली एक तीन मजल्यांची भुयारे, त्यात एखाद्या उंदरासारखे राम, सीता, लक्ष्मण रहात होते याचा मोठा अचंबा वाटला. तीन टप्पे बोळकांडांची ती भुयारे आठवली म्हणजे आजही जीव गुदमरल्यासारखे होते. वनवासी रघुनंदन खरंच या पर्णकुटीत राहिले असतील, या समोरच्या पायऱ्यांवर त्यांचा पदस्पर्श झाला असेल या कल्पनेनेही मोठे अद्भूत वाटायचे.

 पुढे नाशिक सोडले. वेगवेगळ्या निमित्तांनी गोदावरीचा प्रदेश पाहिला. दंडकारण्य नेमके कोठे असावे याची कोठे निश्चिती दिसली नाही. विंध्य

अन्वयार्थ – दोन / २३३