पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/230

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धोरणाचा पराभव होता.
 याउलट परिस्थिती बंगालमध्ये होती. डाव्यांची आघाडी तेथे सहाव्यांदा निवडून आली आहे. त्यांच्या पहिल्या तीन शासनांत जमिनीचे फेरवाटप, सामूहिकीकरण असल्या समाजवादी योजनांची अंमलबजावणी झाली. जमिनीचे इतके तुकडे तुकडे झाले की चेष्टेने, 'जमिनीचे माप एकरगुंठ्यांत न करता काडेपेटीत करावे' असे म्हटले जाऊ लागले. देशात इतरत्र पिकणारे अन्नधान्य व भात यांवर बंगाल जगू लागला. पंधरा वर्षापूर्वी ज्योती बसूंनी बंगालच्या शेतीधोरणास नवी कलाटणी दिली. त्यामुळे तेथील उत्पादन वाढले आणि शेतकऱ्यांच्या मनात सरकारविषयी एक विश्वास तयार झाला. बंगालमधील कम्युनिस्टांचा विजय हा खोलवर जाऊन पाहिले तर, ज्योती बसूंच्या शेतीधोरणावर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे.
 वरवर पहाता गोधळवून टाकणाऱ्या या निवडणूक निकालांच्या मागे एक महत्त्वाचे सूत्र आहे. शेतीसंबंधीचे धोरण यापुढे निवडणुकांचा कल ठरविण्यात प्रमुख रहाणार आहे. विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांनी या मुद्दयावर नेमके बोट ठेवले. केंद्रातील राज्यकर्त्या पक्षाची कुचंबणा शेतीच्या प्रश्नावर होत आहे हे त्यांनी प्रकाशझोतात आणले.
 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका केव्हाही होऊ शकतात/ लोकसभेच्याही निवडणुका काही फार दूर नाहीत. पाच राज्यांतील या निवडणुकांचा अभ्यास आणि त्यावर चिंतन करून राजकीय पक्ष आपापली निश्चित धोरणे ठरविण्याच्या कामास लागतील तर काही निभाव लागेल. पिढ्यानपिढ्यांच्या शोषणाने गांजलेला, कर्जाच्या बोजापोटी निराशेने आत्महत्या करण्यास तयार झालेला शेतकरी मतदार पुढील निवडणुकांवर प्रभाव पाडेल; पण शेतीची परिस्थिती ठोकळेबाज भाषणांनी समजण्यासारखी नाही, सुधारण्यासारखी नाही. त्यासाठी खोलवर आणि दूरवर अभ्यास करून धाडशी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अशी ताकद आणि गुणवत्ता निवडणुकीत उतरणाऱ्या आजच्या कोणत्याच पक्षाकडे दिसत नाही हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आणि त्याबरोबरच देशाचेही.

दि. २३/५/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / २३२