Jump to content

पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शेतीचे आणि शेतकऱ्यांचे भवितव्य मुंबईच्या बंदरात ठरणार नाही किंवा दिल्लीच्या रामलीला मैदानावरही ठरणार नाही. ते देशाच्या सर्वदूर कोन्याकोपऱ्यात पसरलेल्या शेताशेतात, शेतकरी आणि शास्त्रज्ञ मिळून ठरविणार आहेत.
 भुज आणि कच्छच्या प्रदेशात असाच एक मोठा क्रांतिप्रवण प्रयोग गेले तीन महिने चालू आहे. मोठ्या आकाराचा शेंगदाणा, त्यात खवट दाण्यांचे प्रमाण अजिबात असू नये असे वाण तयार करण्यासाठी तेथे संशोधन आणि प्रयोग चालले आहेत. असेच प्रयोग ओरिसा, महाराष्ट्रात अकोला, आंध्र प्रदेशात अनंतपूर या ठिकाणीही चालले आहेत. भूकंपाच्या हादऱ्याने भुजमधील प्रयोग काहीसा विस्कळित झाला आहे. शेतीवर काम करणारे मजूर इकडेतिकडे निघून गेले, त्यांची जमवाजमव झाली, की प्रयोगाच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात होऊन जाईल.

 गुजरातमधील डांग जिल्ह्यात असाच एक नवा प्रयोग चालू आहे. डांग जिल्ह्याची शेती आधुनिक जगाच्या दृष्टीने मागासलेली. पावसाळ्यात पाऊस पडला म्हणजे शंभरसव्वाशे इंच पडतो; पाणी सारे खळखळा वाहून जाते आणि चार महिने गेले, की पिण्याच्या पाण्याचीही वाणवा होते. वरी, नागली, भात ही तेथील महत्त्वाची पिके. आधुनिक शेतीच्या साधनांपैकी वरखते आणि औषधे यांचा फारसा संसर्ग तेथील जमिनीला नाही. खुलिकरणाने डांग जिल्ह्याचे चित्र अकस्मात् पालटणार आहे.
 साखर, कापूस, पेंड हे निर्यातीचे महत्त्वाचे शेतीमाल. परदेशांत ते खपविण्यासाठी मोठे निकराचे प्रयत्न करावे लागतात. याउलट आरोग्याविषयी अधिकाधिक जाणीव होत असलेल्या युरोपीय आणि इतर प्रगत देशांत वरीनागलीसारख्या वर्षानुवर्षे कदान्न मानल्या गेलेल्या गरिबांच्या तृणधान्याला मोठी मागणी येऊ लागली आहे. परदेशातील मोठ्या मोठ्या व्यापारी संस्थांचे प्रतिनिधी डांग जिल्ह्यात आपली कार्यालये थाटू लागले आहेत. होणारे सगळे उत्पादन विकत घेण्याची त्यांची तयारी आहे. त्या पलीकडे जाऊन, हीच धान्ये वरखते आणि रासायनिक औषधे न वापरता, म्हणजे नैसर्गिक शेतीत तयार होत असली तर त्याकरिता पैशांच्या थैल्या मोजण्याची प्रगत देशांतील ग्राहकांची तयारी आहे.
 डांग जिल्हा महाराष्ट्राच्या सरहद्दीच्या जवळचा. वर्षानुवर्षे येथील पुढाऱ्यांनी डांगचा धुळे किंवा सुरत जिल्हा करण्याचे प्रकल्प आणि स्वप्ने लोकांसमोर मांडली आहेत. डोंगरांडोंगरांतून सपाट वावरे तयार करून शेतजमीन तयार करावी, त्यांत फळबागा, विशेषतः द्राक्षबागा आणि ऊस लावावा; डांग जिल्ह्यातच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाजारपेठा तयार व्हाव्यात अशी स्वप्ने ते

अन्वयार्थ – दोन / १८०