पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बंदोबस्त करण्यासाठी निरुपयोगी ठरलेली औषधे घशाखाली घालून तडफडत प्राण सोडीत आहेत आणि त्याच वेळी दुसऱ्या देशातील शेतकरी सरकारी सज्जड साहाय्यामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनाचे उच्चांक मोडीत आहे. उत्पादनखर्च घटवत आहेत आणि जागतिकीकरणाचा झेंडा फडकावीत गाफील देशांच्या बाजारपेठा काबीज करीत आहेत. अशी सारी शेतीची परिस्थिती.
 अशा वेळी भारतीय विज्ञान परिषदेत शेतीशास्त्रज्ञांच्या कौतुकाचा गजर व्हावा, हे काय गौडबंगाल आहे?
 भारतात हरितक्रांती आली. हरितक्रांतीच्या वाणासंबंधीच्या संशोधनाचे श्रेय प्रामुख्याने डॉ. बोर्लोग यांच्याकडे जाते, डॉ. स्वामिनाथन् यांच्यासारख्या भारतीय शास्त्रज्ञांनाही श्रेयाचा मोठा वाटा दिला जातो. उल्लेखनीय गोष्ट अशी, की मुळातले आंतरराष्ट्रीय संशोधन गहू, तांदूळ अशा धान्यांच्या बियाण्यांवर झाले. त्यांतील काही बियाण्यांवर आणखी पुढे संशोधन भारतीय शास्त्रज्ञांनीही केले; पण त्याचे स्वरूप भूमितीतील प्रमेये (थिअरम) मांडल्यानंतर त्यांचा उपयोग करून उपप्रमेयात्मक उदाहरणे (रायडर्स ) सोडविण्यासारखे आहे. परदेशांत डाळींसंबंधी संशोधन झाले नाही, कारण मांसाहारी प्रजेला प्रथिनांची गरज भागविण्याकरिता डाळींचे तितकेसे महत्त्व राहत नाही. भारतातील हरितक्रांती धान्यांपाशीच थांबली, डाळी किंवा तेलबिया यांच्या क्षेत्रात प्रवेश करू शकली नाही, यातील इंगित हेच आहे. भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन परदेशांत संबंधित क्षेत्रात काम झाल्यानंतर मगच उभे राहू लागते.
 समाजवादाच्या काळात, अगदी पहिल्या योजनेपासून शेतीतील संशोधनाचे महत्त्व नियोजनकर्त्यांनी अचूक ओळखले होते. संशोधन व्हावे कसे, करावे कोणी या प्रश्नांची उत्तरे 'इंडिया'तील सवर्ण नोकरशाहीला सोयीस्कर अशी देण्यात आली. पंडितजींना भव्य शिल्पे बांधण्याची दांडगी हौस. मुसलमान आमदानीतील शेवटचे बादशाह आणि अशोकासारखे काही सम्राट यांच्याशीच याबाबतीत पंडित नेहरूंची तुलना होऊ शकते!

 प्रत्येक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळा खोलण्यात आल्या. परदेशांतून संशोधनाची साधने, उपकरणे गठ्याने आणण्यात आली. शास्त्र विभागात एखाददुसरी पदवी मिळालेले स्नातक फटाफट शास्त्रज्ञ Grade I किंवा Grade II वर लागू लागले. सरकारी खाक्या आणि ठरावीक पगार या धबगड्यात प्रतिभावंत शास्त्रज्ञसुद्धा निष्प्रभ झाले असते, येथेतर, किरकोळ अपवाद वगळता, केवळ पोटभरूंचा भरणा झालेला. काहीतरी किडूकमिडूक काम करून नवनवीन पदव्या

अन्वयार्थ – दोन / १४९