पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि विज्ञान परिषदेतील घुसखोर यांच्यातील लागेबांधे समजण्यास अडचण पडू नये.
 विज्ञान परिषदेच्या बाजूला शेतीसंबंधी एक विशेष परिसंवाद घडवून आणण्यात आला. बरोबरच एक शेतकी प्रदर्शन ठेवण्यात आले होते. त्यानिमित्ताने शेतीमालाचा व्यापार, निर्यात, प्रक्रिया कारखाने, यंत्रसामग्री यासंबंधी बडीबडी मंडळी कार्यक्रमास हजर होती. परिसंवादाचा विषय होता 'जागतिक श्रेष्ठतेसाठीची धडक मोहीम'. वेगवेगळ्या क्षेत्रांतील मंडळींनी आपापल्या वक्तव्यात अडचणी सांगितल्या आणि स्पर्धेत टिकायचे असेल तर काय तयारी करावी लागेल यासंबंधी सखोल विवेचने केली. सर्वांचा सूरमात्र आत्मविश्वासाचा आणि आशेचा होता. भारतीय शास्त्रज्ञांचा उल्लेख हरवक्ता बिनचूक करत होता. मंचावरील शास्त्रज्ञांच्या लौकिकाविषयी काय बोलावे? भारतातील टेलिव्हिजनच्या दुकानात एकएक संच मांडून ठेवलेला असतो. जपानमध्ये खास दुकानात अशा संचाचे घालून ठेवलेले ढीग पाहिले म्हणजे जसा अचंबा वाटतो तसेच मान्यवर शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीचा तपशील पाहिला म्हणजे वाटेल. दहावीस आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सन्मानांखाली कोणीच नव्हते. डॉक्टरेट तर थप्पीने मिळालेल्या - कोणाला पंचवीस तर कोणाला तीस! निवृत्तीवयाच्या आधी पंचवीस ते तीस डॉक्टरेट मिळविण्यासाठी या शास्त्रज्ञांनी नेमके काय केले असावे याबद्दल कुतूहल वाटले. पदव्या देणारी विद्यापीठे काही नागपूरची नव्हती, जगभराच्या वेगवेगळ्या देशांतील नामवंत विद्यापीठांच्या त्या पदव्या होत्या. अन्नधान्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केलेल्या कामगिरीबद्दल जागतिक अन्नधान्य पुरस्कार दिला जातो. आजपर्यंत बारा शास्त्रज्ञांना हा मान मिळाला आहे. त्यात पाच भारतीय आहेत. लागोपाठ पाच भारतीय सुंदऱ्या विश्वविजेत्या ठरल्यावर अभिमान वाटावा तसेच भारतीय शास्त्रज्ञांच्या सन्मानांनीही कोणाही देशप्रेमी भारतीयाचा ऊर भरून यावा हे साहजिक आहे.

 डझनांनी पदव्या मिरविणारे आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित शेतीशास्त्रज्ञ मोठ्या संख्येने असलेल्या या देशातील शेतकरीमात्र आज महाअरिष्टात आहे. त्यासंबंधी लोकसभेच्या गेल्याच महिन्यातील सत्रात मोठा धांगडधिंगा झाला. वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षामुळे जमिनीची सुपीकता घटते आहे, भूगर्भातील पाणी खचते आहे, नवीन भांडवली गुंतवणूक नाही, उलट, असलेली यंत्रसामग्रीही निकामी होत आहे. इकडे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा इतका असह्य झाला की, 'दारिद्र्यात् मरणं वरम्' असे म्हणून शेकड्यांनी शेतकरी किडींचा

अन्वयार्थ – दोन / १४८