पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पदरी पाडून घेत, देशीपरदेशी संशोधन संस्थांशी संपर्क साधून परिसंवाद, परिषदा आणि दौरे यांसंबंधी उभयतांत समझोता करून ते 'परस्परम् भावयन्ता' परम श्रेय प्राप्तकर्ते झाले!
 आपल्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन आपल्या पदरी लाटून घ्यावे, दोस्त शास्त्रज्ञांचे कंपू बनवावे आणि प्रकल्प, दौरे, पारितोषके, पदव्या आपल्या कंपूत अधिकाधिक मिळवावेत हे प्रयोगशाळांतील मुख्य काम झाले. काही वर्षांपूर्वी म्हैसूर येथील शेतीमाल प्रक्रियेसंबंधीच्या मोठ्या विख्यात प्रयोगशाळेस भेट देण्याचा योग आला. 'इतर संशोधनशाळांचे जे काही असेल ते असो, ही संशोधन संस्थामात्र सर्वोत्कृष्ट काम करीत आहे', असा निर्वाळा मला अनेकांनी दिला होता. भेटीच्या शेवटी तेथील शास्त्रज्ञांना मी एक प्रश्न विचारला, आतापर्यन्त या संशोधनशाळेतून निष्पन्न झालेला सर्वांत मोठा शोध कोणता? एकमेकांशी विचारविनिमय करून उत्तर देण्यात आले ते असे : जगभर लहान बालकांकरिता खाद्य (Baby Food) बनविताना गायीच्या दुधाचा वापर केला जातो, म्हशीच्या नाही. आपल्या देशात म्हशींची संख्या मोठी आहे; पण त्यांचे दूध बालकांकरिता वापरता येत नसे. आम्ही संशोधनाने त्यातील चरबी (Fat) कमी करून म्हशीच्या दुधातून बालान्न तयार करणे शक्य केले.
 हिंदुस्थानातील दूधपित्या बालकांच्या आया या प्रश्नाचे उत्तर केव्हाच काढून बसलेल्या आहेत आणि आजही गायीचे दूध मिळाले नाही तर म्हशीच्या दुधात पाणी मिसळून त्यात थोडी संगजिऱ्याची पूड घालून त्या आपल्या मुलांची गरज भागवितात. अशा संशोधनासाठी कोट्यवधी रुपये खर्चुन पंचतारांकित संशोधनसंस्था उभ्या करण्याची आणि चालविण्याची काही आवश्यकता होती काय?
 डॉ. श्रीपाद दाभोळकरांनी प्रयोग परिवाराचा कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत द्राक्ष क्रांती करून दाखविली.
 शेतकरी महिला आघाडीच्या 'सीता शेती' योजनेत ग्रामीण भागातील स्त्रियांकडून त्यांच्याच शेतांवर काही संशोधनाचे काम करून घेण्याची कल्पना होती.
 या दोनही योजनांत निघालेले निष्कर्ष शेतकऱ्यांकडे पोहोचविण्यात काहीच अडचण आली नाही. भारतातील समाजवादी परंपरेच्या संशोधन शाळांपुढे शेतकऱ्यांपर्यन्त संशोधन पोहोचविण्याची समस्या बिकट होऊन बसली आहे.

 संशोधनाचा विषय शेती. शेतीवरील संशोधन करण्यासाठी वेगळी कुंपणे घालून बंदिस्त प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या. कुंपणाआड चाललेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे कसे यासाठी एक वेगळी यंत्रणा सर्वदूर उभारण्यात

अन्वयार्थ – दोन / १५०