पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आधाराने, हिंदुस्थानात अश्या तऱ्हेच्या उद्योजकांच्या एका आघाडीची गरज असल्याचे प्रतिपादन मी केले आहे.
 अलीकडे लेखन उदंड झाले आहे आणि छापील पुस्तकेही उदंड झाली आहेत. हल्ली ज्याने काही पुस्तक लिहिले नाही, प्रबंध लिहिला नाही, काही संशोधनात्मक काम केल्याची मान्यता मिळविली नाही असा मनुष्य सापडणेच कठीण आहे. एका काळी हाताने लेख लिहून, त्याचे खिळे जुळवून, छपाईच्या जुन्या यंत्रावर ते घालून पुस्तकाचा मजकूर छापावा लागत होता. त्या वेळी पुस्तक लिहिणे आणि ते प्रकाशित करणे हे काही येऱ्यागबाळाचे काम नव्हते. त्यासाठी टिळकआगरकरांसारखी ध्येयनिष्ठा, उत्साह आणि चिकाटी लागत असे. अलीकडे शब्दांचा भरमार झाल्यामुळे परिणाम असा झाला आहे की, इतके शब्द आपल्या मनाच्या पटलावर उमटवून घेऊन त्याप्रमाणे प्रत्यक्षात काही कार्यवाही करण्याची काही शक्यता तयार होणे जवळजवळ संपुष्टात आले आहे. छापणे उदंड झाले आहे, पण त्यामुळे लिखित शब्दच मेला आहे अशी एक कल्पना मी मांडली आहे.
 आतंकवाद सर्वत्र माजलेला आहे अशा काळामध्ये ज्या काळामध्ये अश्या तऱ्हेच्या गुंडगिरीला नावे ठेवली जात होती त्या वेळची पद्धत कशी होती यासंबंधी मी एक लेख लिहिला आहे. दक्षिण आशियातील छोट्या छोट्या हजारो बेटांमध्ये इंग्रजांनी राज्य चालविले. सबंध बेटावर असला तर एखादा इंग्लिश परुष किंवा एखादी बाई मिशनरी असे. त्याचे/तिचे संरक्षण करण्याकरिता तेथे शासकीय यंत्रणा किंवा पोलिस यंत्रणा नव्हती. आणि, तरीसुद्धा त्या इंग्लिश पुरुषाला किंवा बाईला हात लावण्याची स्थानिक लोकांची हिम्मत होत नसे. त्यांना हे माहीत होते की, आज आपण जर असे काही दुष्कृत्य केले तर लगेच नाही पण काही वेळाने का होईना, सबंध इंग्रजी फौज जहाजांनी येऊन त्यांच्यावर तुटून पडेल आणि सबंध बेटाचा आणि समाजाचा नि:पात होईल. कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे काही पोलिस आणि चोर यांचा खेळ नाही. पोलिसांची संख्या वाढवून माणशी एक पोलिस केल्याने कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित होत नाही. त्यासाठी कायद्याचा धाक बसण्याची आवश्यकता आहे. सरकारची पकड कमी व्हायला पाहिजे, सरकारचे विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे हे खरे आहे, पण त्याबरोबर सरकार आणि प्रशासन यांच्या विषयी लोकांच्या मनात धाक असणे हेही आवश्यक आहे.
 आतंकवादाचा आणखी एक परिणाम म्हणजे ज्या त्या अतिविशिष्ट व्यक्तीस

सात