पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 लुटारू राजे
 बैलाला वेसण घालून शेतीची सुरुवात झाली आणि शेतावर राबणाऱ्यांच्या पोटाच्या गरजा भागून उरेल असे धान्य खळ्यावर पडू लागले.तेव्हापासून धान्याच्या राशीच्या लुटालुटीला सुरुवात झाली. जमीन,पाणी,हवा आणि सूर्यप्रकाश यांनी औदार्याने शेतकऱ्याच्या हाती दाण्याचा गुणाकार करण्याचा चमत्कार ठेवला; पण हा गुणाकार हाती पडायला वर्षभराचे कष्ट लागत.दरोडेखोरीचा व्यवसाय त्याहीपेक्षा घबाड हाती देणारा आणि तेही एका दिवसात.साहजिकच दरोडेखोरांची संख्या वाढली.दरोडेखोर टोळ्यांच्यात एकमेकांत सतत लढाया होऊ लागल्या विजेत्या टोळ्यांनी एका एका प्रदेशावरती आपला अंमल बसवला;तेव्हापासून मुलूख,सुभा,देश आणि राष्ट्र इतिहासात अवतरले.आता दरोडेखोर राजांना स्वत:च्या प्रदेशात दरोडे घालण्याचे फारसे काम राहिले नाही.मुलूखगिरी करायची ती दुसऱ्या दरोडेखोरांच्या प्रदेशात.आपल्या मुलुखात दुसऱ्या दरोडेखोरांना घुसू द्यायचे नाही, आपल्या प्रदेशातील रयतेचे थोडेफार सभ्यपणे आणि इतर राज्यातील जनतेचे धन आणि प्राण अनिर्बंधपणे हरण करणे ही राजसत्तेची कामगिरी होती.जुन्या दरोडेखोरीच्या व्यवसायाला अंतर्गत व्यवहारात सभ्य स्वरूप आले.खळ्यावरील लूट बंद पडली,त्या जागी महसुलाची व्यवस्था आली.जाणाऱ्यायेणाऱ्यांना धाडी घालून लुटण्याऐवजी त्यांच्यावर जागोजागी जकात बसवण्याची व्यवस्था आली.थोडक्यात टोळीच्या कालखंडातील जनकल्याणी स्त्रीशासनाऐवजी निसर्गक्रमाशी विपरीत असे संपत्तीचे वाटप शस्त्रास्त्रांच्या बळावर लादणारी पुरुषसत्ताक शासन व्यवस्था आली.

 राजकारणाचा अर्थकारणाशी अतूट संबंध आहे. अर्थशास्त्राच्या सुरुवातीच्या काळात त्याचे नावच मुळी राजकीय अर्थकारण असे होते.
 शेतकरी, बलुतेदार, व्यापारी यांनी संपत्तीचे उत्पादन करावे आणि त्यातील एक मोठा हिस्सा सिंहासनावर बसणाऱ्या आणि छत्रचामराचे ढाळवून घेणाऱ्या दरोडेखोरांनी काढून घ्यावा अशी व्यवस्था उभी राहिली. राजाला कर दिल्याने निदान आपले इतर दरोडेखोरांपासून तर संरक्षण होते ना अशा विचाराने रयतेनेही त्या व्यवस्थेशी जुळवून घेतले. तसे त्यांना काही गत्यंतरही नव्हते. आम लोकांकडून विटंबना होण्यापेक्षा एकाच नवऱ्याकडून काय हाल होतील ते सोसावे अशी स्त्रियांची भावना असते, तशीच रयतेची.
 शेतकरी आणि शहरी सत्ता
 पहिल्या काळात राजांचे साथीदार शेतकऱ्यांकडून महसूल वसुली करणारे

अन्वयार्थ - एक / ६९