पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






राजनीती आली माहेराला


 राजकारणाची प्रेरणा कोणती? कोणत्याही देशातील सरकारी धोरणांचे स्वरूप कसे काय ठरते? या विषयावर सिद्धांत अनेक आहेत. राजांची कारकीर्द इतिहास ठरवतो की राजे इतिहास बनवतात? याबद्दल संशय बाळगण्याचे कारण नाही, राजेच इतिहासाची दिशा ठरवतात. या अर्थाचे जुने संस्कृत वचन आहे. राजांचे कर्तृत्व ही एक नजरभूल आहे. कोणताही राजा इतिहासातील एक भूमिकाच बजावत असतो असे आता सर्वमान्य आहे.
 राजसत्ता तोफेच्या नळीतून उद्भवते असा माओ त्से तुंगचा एक विचार आहे. तोफेची नळी असो, तलवारीचे पाते असो, धनुष्यबाण असो, बंदुका असोत, की प्रचंड पल्ल्याची महाविनाशी क्षेपणास्त्रे असोत सरकार म्हणून जे काही आहे त्याची ताकद शेवटी लष्करी सामर्थ्यात आहे यात काहीच शंका नाही. केवळ उदार दृष्टिकोन, जनकल्याणाची इच्छा आणि न्यायबुद्धी या आधाराने सरकार टिकत नाही. हाती शस्त्रसामर्थ्य असले तर अगदी रानटी टोळ्या आणि खलपुरुषसुद्धा सज्जन सरकारे क्षणार्धात उलथवून टाकू शकतात. हे इतिहासात घडले आहे, आजही दर दिवशी घडते आहे.

 राजसत्तेची उत्क्रांती मुळातच दरोडेखोरीतून झालेली असल्यामुळे ती आजही शस्त्रसामर्थ्यावर आधारलेली असावी हे साहजिक आहे. रानावनात फिरून फळे, कंदमुळे गोळा करणाऱ्या आणि शिकार करणाऱ्या मनुष्याच्या पूर्वजांच्या काळात टोळ्या होत्या आणि टोळ्यांचे आधिपत्य टोळीतील स्त्रियांकडे होते. मुलांना जन्म देऊन टोळीचे सातत्य राखणे ही जबाबदारी आणि मिळालेल्या अन्नाचे वाटप ही दैनंदिन जबाबदारी दोन्ही स्त्रियांकडेच होत्या. निसर्गक्रमाला अडथळा न आणता, त्यातील दोष दूर करून जनांचे सुखसमाधान वाढवण्याची व्यवस्था असलेले पहिले 'सरकार' टोळीच्या कालखंडाबरोबरच संपले.

अन्वयार्थ - एक / ६८