पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/363

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





चोर, हर्षद, कवी, शास्त्रज्ञ आणि डंकेल


 शेअर बाजार घोटाळ्याचे प्रकरण सगळीकडे गाजले आहे. हजारो कोटी रुपयांचा घपला, त्यात मोठमोठ्या लोकांचे हात गुंतलेले. शेअर बाजारातील रामायणाचा नायक म्हणजे हर्षद मेहता. त्यांच्या पराक्रमाने अयोध्येचा रामसुद्धा मागे पडला. आजपर्यंत जो काही पुरावा पुढे आला आहे त्यावरून भूपेन दलाल, कृष्णमूर्ती इ. काही मंडळी या एकूण घोटाळ्यास हर्षद मेहतापेक्षा जास्त जबाबदार आहेत; पण सर्वमुखी नाव झाले आहे हर्षद मेहताचे.
 चोर आणि हर्षद
 दहावीस हजार रुपयांचा दरोडा घालणारा टोळीवाला पोलिसांनी पकडला म्हणजे लोक त्याला पाहायला जमतात. "काय भयानक खतरनाक माणूस!" अशा थोड्या भयाने लोक त्याला पाहायला जमतात. हर्षदने केलेला घपला तीनचार हजार कोटींचा. त्याच्या कारवायांमुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत; पण त्याच्याविषयी चर्चा, "काय भयानक माणूस आहे!" अशी नाही, "पठ्ठा बहाद्दर आहे; पण थोडा फसला, नशीब बेकार!" अशा स्वरात.
 एखादं फाटकं पोर पाचपंचवीस रुपयांकरिता खिसा कापायला जाते. जर का सापडलं तर आसपासचे सगळे लोक निर्दयपणे लाथाबक्क्यांनी त्याला तुडवून काढतात. मारणाऱ्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठा संताप आणि त्या फाटक्या पोराविषयी राग राग असतो.
 हर्षद मेहताने सगळ्या समाजाचा खिसा कापला, थोडा थोडक्याला नाही दोन-तीन हजार कोटीला कापला; पण कोर्टाच्या आवारात त्याला पाहायला जमलेल्या लोकांमध्ये 'ठोका लेकाला' अशी भावना नसते. "आहे कर्तबगार; पण चुकला, भोगेल बिचारा, आपल्या कर्माची फळे," अशी भावना असते.

 चाकू, कुऱ्हाड वापरून दरोडा घातला म्हणजे त्याच्याविषयी लोकांमध्ये

अन्वयार्थ - एक / ३६४