पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/355

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






मालकाला विकणारे नोकरदार


 हिंदी सिनेमात नेहमी दाखवला जाणारा एक प्रसंग आहे. श्रीमंत धीरोदात्त नायक कारखानदार किंवा बडा जमीनदार असतो. त्याला कोणीतरी फसवतो. एका दिवसात त्याची सारी धनसंपदा त्याच्या हातातून निघून जाते. घरातील सगळ्या नोकरमंडळींना तो जमा करून सांगतो, "तुम्ही माझी खूप सेवा केलीत; पण यापुढे तुमचा पगार देणे मला शक्य नाही, हे थोडेफार माझ्याकडे उरलेले पैसे घ्या आणि आपल्या चरितार्थाची सोय दुसरीकडे कोठेतरी बघा." नायक असे बोलत असताना गंभीर चेहऱ्याने तोंडावरची सुरकती हलू देत नाही आणि नोकरवर्गमात्र बिचारा धायीधायी रडत असतो. ते मालकाला म्हणतात, "मालक! इतके दिवस आम्ही तुमचे अन्न/मीठ खाल्ले आता तुमच्यावर कठीण प्रसंग आला, आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्ही आम्हाला एक पैसासुद्धा देऊ नका."
 दिवाळखोर सरकारचे नोकर
 हिंदी चित्रपटात वास्तविकता शोधून सापडणे कठीण; पण इतकी देशातील सत्य परिस्थितीला सोडून असलेली गोष्ट कोणती नसेल.

 हिंदुस्थान सरकारचे दिवाळे वाजले आहे. कोणा दुष्टाने त्याला बुडवलेले नाही, आपल्या स्वतःच्या अकार्यक्षमतेने, गलथानपणाने आणि चैनबाजी - उधळपट्टीने त्यांचा धंदा बुडाला. एक काळ असा होता, की सगळ्या देशाची आर्थिक, सामाजिक व्यवस्था सरकारच्या हाती होती. सरकारने वाटेल तितका कर जमा करावा, मन मानेल तितकी कर्जे घ्यावी, परदेशांतून अब्जावधींची कर्जे आणि मदत घ्यावी आणि शेवटी नोटांचा छापखाना चालवावा; पण खर्च चालवावा. नोकरचाकर वाढत गेले. त्यातला क्वचित एखादा सेवाभावी, बहुतेक सारे आपली तुंबडी भरून घेणारे आणि सत्तेच्या बळावर जनतेला हैराण करणारे.

अन्वयार्थ - एक / ३५६