ममहाराष्ट्राच्या साऱ्या इतिहासात तलवारीच्या खणखणाटीबरोबर तुतारीची भेरी आणि शाहिराच्या हाताची डफावरील थाप यांचीही मोठी महत्त्वाची कामगिरी आहे. स्वराज्य संस्थापनेच्या काळात 'शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानी ऐकावा' व छातीचे बंद तटतटा तुटावे, अशा ओजस्वी कवनांचे तुळशीदासाच्या परंपरेतील शाहीर झाले. थोरल्या बाजीरावांच्या अमदानीपासून दर विजयादशमीला उत्तरेकडे कूच करून भीमथडीच्या तट्टांना गंगाथडीचे पाणी पाजून अटकेपार झेंडे नेण्याच्या काळात मऱ्हाटी लष्कराच्या छावणीत आणि पुण्यातील पेठापेठांच्या चौकात शाहिरी पोवाड्यांचे अड्डे जमत.
ही परंपरा इंग्रजी अमलातही चालू राहिली. ज्योतिबा फुल्यांना छत्रपती शिवाजीवर पोवाडा लिहिण्याची स्फूर्ती झाली आणि इंग्रजांच्या साम्राज्याचा डोलारा कोसळत असताना शिरीषकुमारपासून हेमू कलानीपर्यंत आणि वासुदेव बळवंत फडक्यांपासून भगतसिंगापर्यंत प्रत्येक हुतात्म्याच्या रक्ताच्या थेंबागणिक स्फूर्तिदायी काव्याची कारंजी जनसामान्यांनाही प्रेरणा देत होती.
शाहिरांचे डफच हत्यारे बनली
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा काळ म्हणजे तर मराठी शाहिरांच्या पराक्रमाचा आणि वैभवाचा सुवर्णकाळ. शिपायांनी तलवार गाजवावी आणि शाहिरांनी त्यांचे गुणगान करावे या परंपरेत किंचितसा फरक पडला. लोकतंत्राच्या नव्या जमान्यात शाहिरांचे डफ, एवढेच काय, झिलकऱ्यांचे तुणतुणेसुद्धा हत्यारे बनली. शाहीर हेच योद्धे झाले. असे योद्धे, की ज्यांच्या सामर्थ्यापुढे मुंबईच्या काय, दिल्लीच्याही महासत्तेचे पाय चळाचळा कापावेत आणि घरभेदे सूर्याजी पिसाळ मनातील भेकडपणा शौर्याच्या बातांखाली लपवणाऱ्यांना 'दे माय धरणी ठाय' होऊन जावे.