पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून पंडितजींच्या उद्योगंडाची खुशामत केली ती डॉ. महालनोबिस यांनी. मोठमोठे टोलेजंग कारखाने उभे राहिले पाहिजेत, गुंतवणुकीचा मोठा भाग या कारखान्यांसाठी गेला पाहिजे; पण लोखंड, पोलाद काही खायच्या उपयागाचे नाहीत. म्हणून लोकांच्या गरजा भागवण्याचे काम कुटीरोद्योगांनी केले पाहिजे. पोलाद कारखाने आणि अंबरचरखा यांना एकत्र बांधणारे असे अजब तंत्र त्यांनी शोधून काढले.
 चाकरमाने कारखानदार
 ...पण ही अवजड कारखानदारी करणार कोण? स्वप्ने रंगवणे हे काव्यहृदयी राजकारण्यांना सुचते, कोणाही व्यावसायिकाला ही असली चैन परवडत नाही. खरेखुरे अनुभवी कारखानदार असल्या पागलपणात सहभागी होणे शक्यच नव्हते. मग पंडितजींचे लाडके औद्योगिकीकरण व्हायचे कसे? मग दुसरे काही 'रासपुतीन' पुढे आले आणि सांगू लागले, "खासगी उद्योजक पुढे आले नाहीत तरी पर्वा नाही, सरकारी आश्रयाने सार्वजनिक क्षेत्र हे धाडस करायला तयार आहे." सार्वजनिक क्षेत्राचे 'निर्णायक प्रभुत्व' हा सिद्धांत त्यांनी मांडला आणि आसपासच्या सगळ्यांनी 'वाहवा, वाहवा' क्या कही अशी दाद दिली. काल- परवापर्यंत कागदांच्या फायली पुढे मागे सरकवणारे नोकरमाने एका रात्रीत प्रचंड कारखान्यांचे प्रशासक बनले.
 स्वावलंबनाचे स्वप्नरंजन
 या शेतकरीद्वेष्ट्या आणि सार्वजनिक क्षेत्राच्या कारखानदारी व्यवस्थेचे आणखी एक मोठे विचित्र रूप होते. जगातील पुढारलेल्या देशांतील व्यवस्थांबद्दल एकाच वेळी मोठा तिरस्कार आणि उमाळ्याचे प्रेम होते. भारतासारखा खंडप्राय देश 'स्वयंभू' झाला पाहिजे. आज आम्हाला परदेशांतून आर्थिक आणि तांत्रिक मदतीची गरज आहे, ती त्यांनी द्यावी आणि बाजूस चूप बसावे. त्यांनी दिलेल्या मदतीचा उपयोग आम्ही कसाही करू, तो आमचा सार्वभौम हक्क आहे. आमच्या दात्यांनी त्याबद्दल चकार अवाक्षर काढू नये. निष्कामपणे आम्हाला मदत करावी. आम्ही त्यांचा माल खरीदणार नाही. निर्यात करण्याची आमची पात्रता नसल्यामुळे देशात कोटा परमीट राज्य आले, भ्रष्टाचार आला, राष्ट्रीय नादारी आली.
 संभाजीमहाराज गेले
 आता देशाचे दरवाजे परकीय गुंतवणुकीकरिता सताड उघडे करण्यात आले आहेत. पंतप्रधान, वित्तमंत्री, देशोदेशी जाऊन 'भारतात गुंतवणूक करा' अशी

अन्वयार्थ - एक / ३३