पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विनवणी करीत आहेत, असा जोगवा मागत फिरत आहेत.
 गेल्या चाळीस वर्षांत अर्थशास्त्रज्ञांची मोठी चलती झाली. त्यांचा हा 'सुवर्णकाळ'च होता. अर्थशास्त्रज्ञांना मोठी मान्यता होती. मोठमोठी पदे. मनसोक्त साधनसंपत्ती त्यांच्यापुढे हात जोडून उभी होती. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक सिद्धांताने देशाचे वाटोळे झाले.
 हे सगळे जुने नाशकारी सिद्धांत बाजूला सारून, खुल्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याची घोषणा झाली आहे आणि मंगलकार्य असो, मार्तिक असो पुरोहित आम्हीच अशा थाटात जुन्या व्यवस्थेतील सगळे 'घाशीराम', रासपुतीन' आणि 'कलुषा कब्जी' नव्या व्यवस्थेतही पुन्हा डौलाने मिरवू लागले आहेत.
 संभाजीबरोबर कलुषा संपला, बाजीरावाच्या आधी घाशीराम कोतवाल, तीच कथा रासपुतीनची; पण या सर्व काळपुरुषांचे आधुनिक अवतार अर्थशास्त्री त्यांच्या स्वामीबरोबर संपले तर नाहीतच, उलट नव्या व्यवस्थेत नव्या स्वामींच्या आश्रयाखाली पुन्हा पहिल्या दिमाखानेच मिरवीत आहेत.

(२१ जानेवारी १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३४