पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 डावे पंडित
 अशोक मित्राही असेच जागतिक मान्यताप्राप्त अर्थशास्त्रज्ञ. बंगालमधील कम्युनिस्ट शासनाचे मंत्री, कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि इतर अनेक मोठमोठ्या पदावर राहिलेले. मोठ्या शहरातील वैभव वाढते आहे, शहरे आणि खेडी यांच्यातील दरी पसरते आहे, हे इतके उघड आहे, की ज्याला डोळे आहेत त्याला हे पटवून देण्याची काही गरज नसावी. दहा वर्षांपूर्वी एक पोते शेतीमाल विकला तर त्यातून काय खरेदी करता येत होती आणि त्या तुलनेने आज करता येणारी खरेदी किती तुटपुंजी आहे हे कुणीही अडाणी निरक्षर शेतकरी बाईसुद्धा जाणते; पण अर्थशास्त्रचूडामणी डॉक्टर अशोक मित्रा यांचा निष्कर्ष असा, की व्यापाराच्या अटी सतत शेतकऱ्यांच्या फायद्याच्या होत आहेत, त्यांची भरभराट होते आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे देशातील समाजावरच नव्हे तर राजकारणातही वर्चस्व तयार झाले आहे!
 शेती व्यवसाय म्हणजे मागास काम, अजागळ कारभार, शेती आधुनिक झाली तरच शेतीत सुधारणा होईल. त्याकरिता पहिल्यांदा म्हणजे मोठे शेतकरी संपवले पाहिजेत, जमिनीचे फेरवाटप झाले पाहिजे, सहकारी शेती उभी राहिली पाहिजे, रासायनिक खते आणि यंत्रसामग्री वापरली पाहिजे, या पद्धतीने शेतमालाचे डोंगर रचता येतील. हा सिद्धांत तर सर्व डाव्या मंडळींचा अत्यंत आवडता. या सिद्धांताला कोणा एका शास्त्राचे नाव देणे कठीण आहे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या असल्या प्रयोगांनी रशियासारख्या देशात दुष्काळ पडला; पण आमचे अर्थशास्त्रज्ञ आजही शेतजमिनीचे फेरवाटप हाच महत्त्वाचा मुद्दा आहे असा धोशा लावतात.
 आज देशावर आर्थिक अरिष्ट आले आहे; पण भारतीयांना पावाचा तुकडा मिळवण्यासाठी मॉस्कोतील नागरिकांप्रमाणे रात्रभर थंडीवाऱ्यात रांग करून उभे राहावे लागत नाही, याचे श्रेय चौधरी चरणसिंगांना आहे. शेतीच्या सहकारीकरणाचा नेहरूंचा प्रस्ताव चौधरीजींनी हाणून पाडला नसता, तर आपल्या सर्वांवर उपासमारच ओढवली असती.
 कोरडे पाषाण
 आर्थिक प्रगतीकरिता उद्योगधंद्यांची वाढ व्हायला पाहिजे हाही असाच एक सिद्धांत. रशियातील क्रांतीनंतर पंडितजी तेथे गेले आणि त्यांना जे दाखवण्यात आले त्यामुळे त्यांचे कविमन भारून गेले. नवा भारत म्हणजे आधुनिक उद्योगधंद्यांचा देश असा त्यांचा पक्का ग्रह झाला. महात्माजींच्या सहवासाचे भाग्य सातत्याने लाभूनसुद्धा याबाबतीत पंडितजी कोरडे पाषाण राहिले.

अन्वयार्थ - एक / ३२