गावाच्या वेशीबाहेर शतकानुशतके ठेवल्या गेलेल्या समाजांना काय नावाने संबोधावे हा मोठा नाजूक, कठीण आणि क्लिष्ट चर्चेचा विषय अनेक वर्षे चघळला जातो आहे. कांशीराम आणि मायावती यांनी अलीकडे 'हरिजन' शब्दाचा प्रयोग करणाऱ्या महात्मा गांधींवरही ते तुटून पडत; या जातीचा उल्लेख 'दलित' म्हणूनच झाला पाहिजे असा आग्रह धरला, तेव्हापासून या प्रश्नाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे एवढेच.
फुकटची 'महारकी'
नामाभिधानाचा प्रश्न किती नाजूक आहे याचा अनुभव संघटनेच्या कामात अगदी सुरुवाती सुरुवातीलाच मला आला. "शेती परवडत असती तर निवडणुका लढवून पुढारी होण्यासाठी कोणी धडपड केली नसती; शेतीत काही भेटत नाही, पुढारी बनले म्हणजे चंगळ होते म्हणून लोक राजकारणाकडे वळतात; नाहीतर पुढारीपणाची फुकटची उठाठेव करायला कोण जाईल? या लष्कराच्या भाकऱ्या कोण भाजेल?" ही कल्पना मांडण्याकरिता मराठीतील एका फार जुन्या वाक्प्रचाराचा मी एका सभेत उपयोग केला. "नाहीतर ही फुकटची म्हारकी कोण करेल?" असा प्रश्न टाकला. भाषणानंतर एक तरुण मला भेटायला आला आणि त्याने वाक्प्रचार म्हणूनसुद्धा 'म्हारकी' शब्द वापरला जावा याचा विरोध केला. मुद्दा काही मला पटला नाही.
मुसलमान अमलात हिंदूंचा उल्लेख तुच्छतेने 'काफीर' व्हायचा म्हणून आम्हाला हिंदू म्हणू नका असा आग्रह कोणी धरला नाही. इंग्रजी अमदानीत 'भारतीय व कुत्रे यांना प्रवेश नाही' अशा पाट्या गौरकायांच्या खास राखीव जागात असत; पण म्हणून कोणी आम्हाला भारतीय म्हणू का असे कुणी म्हटले नाही. मग सनातन समाजाने ज्यांच्यावर अमानुष अत्याचार केले, त्यांनी आपल्याला