बेनझीर भुत्तोंना अटक करता?
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हिंदुस्थानविरुद्ध अलीकडे कितीतरी दुष्ट विधाने केली. त्यांचा निषेध झाला; पण बेनझीरबाईंना अटक करण्याची भाषा झाली नाही, कारण हिंदुस्थानातील कायदे कानून त्यांना लागू नाहीत. दुसऱ्या एका सार्वभौम समांतर सत्तेच्या त्या अधिपती आहेत, त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात काय अर्थ आहे? पाकिस्तानविरुद्ध युद्ध करून, त्याचे सार्वभौमत्व नष्ट केले तर बेनझीर बाईंवर कारवाई करता येईल, अन्यथा नाही. तसे ठाकरे एका समांतर सत्तेचे अधिपती आहेत. त्यांना अटक करण्याची कल्पनाच सेनेचे समांतर सार्वभौमत्व शिल्लक असेपर्यंत, मुळात खुळचट आहे.
ठाकरे समांतर शासनाचे प्रमुख आहेत
समांतर शासनाविषयी फारसे बोलले जात नाही, समांतर अर्थव्यवस्थेची चर्चा अनेकवेळा होते. राष्ट्रीय उत्पन्न आणि समांतर अर्थव्यवस्थेतील उलाढाली यात वरचढ कोण? याचीही चर्चा चालते. समांतर अर्थव्यवस्था म्हणजे दिवाभिताप्रमाणे जगणाऱ्या लोकांचे लपूनछपून होणारे व्यवहार ही कल्पना खरी नाही. समांतर अर्थव्यवस्थेचे स्वतःचे एक राष्ट्र आहे, शासन आहे, व्यवस्था आहे, न्यायव्यवस्था आहे. तेथील माणसे मोठ्या थाटात फिरतात, वावरतात. समांतर शासनव्यवस्था अधिकृत सरकारी व्यवस्थेपेक्षा कमी कोठेच नाही, वरचढ अनेक बाबतीत आहे. ठाकरे अशा एका समांतर शासनाचे प्रमुख आहेत. बेनझीर भुत्तोंना जशी अटक करता येत नाही तसाच ठाकऱ्यांनाही हात लावता येणार नाही.
सर्वंकष सेनाशासन
समांतर शासनाच्या सामर्थ्याची आणि सत्तेची झलक मोठ्या अचानकपणे पाहायला मिळाली. मुंबईमधील एका छापखान्यात काही किरकोळ छपाईचे काम करून घेतले. छपाई झाली आहे असा निरोप मिळाल्यावर गठ्ठे ताब्यात घेण्याकरिता मी स्वतः गेलो, सगळे मिळून सहा छोटे गठ्ठे मी आणि माझ्या दोन सहकाऱ्यांनी एकाच फेरीत उचलून गाडीत ठेवले आणि छपाईचे बिल चुकविण्याकरिता मॅनेजर साहेबांच्या खोलीत परत आलो. खोलीतील वातावरण अगदी गरम. मॅनेजरसाहेबांसमोर पहिलवानी बांधाचा, भरघोस मिशावाला, कपाळावर शेंदूर किंवा केशरउटी लावलेला, गळ्यात भगव्या रंगाचा पटका असा एक बलदंड असामी मॅनेजर साहेबांकडे बोट रोखून तावातावाने बोलत होता,
"या साहेबांना गठ्ठे उचलून घेऊन जाताना आम्ही स्वतः पाहिले आहे, मग