पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/223

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






शिवसेनेचे समांतर सरकार!


 १९ फेब्रुवारी १९९४ रोजी स्वतःला हिंदूंच्या हृदयाचे सम्राट म्हणवणाऱ्या बाळ ठाकरे यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांना बेदम मारझोड करवली. त्यामुळे बरीचशी खळबळ उडाली. स्थानिक पत्रकारांनी निषेध केला, मोर्चे काढले, शिवसेनेच्या कार्यक्रमांवर बहिष्कार जाहीर केले. मागे 'महानगर' सायंदैनिकावरील हल्ल्याच्यावेळी दिल्लीची वरिष्ठ पत्रकार मंडळी सेनाभवनासमोर धरणे धरण्यासाठी येऊन बसली होती. या वेळी तशी कोणी आली नाहीत. राज्यसभेत ठाकऱ्यांच्या अटकेची मागणी झाली.सी.बी.आय.सर्व प्रकरणी चौकशी करणार असल्याचेही जाहीर झाले. एका व्यंगचित्रकाराने 'अय्या! कम्माल म्हणजे कम्माल आहे सी.बी.आय.च्या धाडसाची!' असे कौतुकही जाहीर केले.
 पवार कुलरीती
 मुख्यमंत्र्यांनी ठाकऱ्यांना चार दिवसांत अटक होईल अशी घोषणा केली, तेव्हा अटकबिटक काही होणार नाही, हे सर्व जनतेस स्पष्ट झाले. 'प्राण जाँही पर वचन न राखी' ही 'पवार कुलरीती' चालत आली आहे आणि चालत राहणार आहे हे सर्वश्रुत आहे. बाळासाहेब ठाकऱ्यांना चार दिवसांत अटक झाली नाही. 'आठ दिवसात नक्की होईल' असे मुख्यमंत्री म्हणाले. आजमितीस दोन आठवडे उलटले. या वेळी पोलिसांनी ठाकऱ्यांविरुद्ध निदान तक्रार अर्ज दाखल केला म्हणजे मोठी बहादुरी झाली.

 ठाकऱ्यांना अटक करता आली नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी दुःख करण्याचे काही कारण नाही! जी गोष्ट केवळ अशक्य कोटीतील आहे ती घडवता न आल्याबद्दल दुःख करणे निरर्थक आहे? 'शस्त्रेण रक्ष्यं यद अशक्य रक्ष्यं! न तद् यशः शस्त्रभृताम् हिनोति!! हा सल्ला दिलीप राजाच्या गायीचे भक्ष्य करू इच्छिणाऱ्या सिंहाने दिलेलाच आहे.

अन्वयार्थ - एक / २२४