पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/218

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



अर्थमंत्र्यांनी शेतकरीवर्गाला देशाच्या वेशीबाहेर ठेवले


 गावचा मोठा उत्सव असावा, सगळे गाव पताका-तोरणांनी सजलेले असावे, पंगती झडत असाव्यात, अशावेळी आपल्याला शेवटच्या पंगतीचे का होईना बोलवणे येईल अशा आशेने राजवाड्यातल्या माणसाने ताटकळत बसावे तशी स्थिती. अंदाजपत्रकाच्या दिवशी मला या राजवाड्यातील गरीब दलितांप्रमाणेच वाटत होते. दूरदर्शनवरून अंदाजपत्रकाचा सोहळा थाटामाटात दाखवण्याची केवढी प्रचंड जय्यत तयारी करण्यात आली होती. भारतातील सगळे प्रमुख कारखानदार दिल्लीमध्ये CII च्या कचेरीत एकत्र जमले होते. अंदाजपत्रकावरची त्यांची भाष्ये आणि प्रतिक्रिया नोंदण्यासाठी टेलिव्हिजनचा कॅमेरा तेथे सज्ज होऊन बसला होता. मुंबईच्या शेअर बाजारात आणि बंगळूरच्या एका सुपर मार्केटमध्येही अशीच व्यवस्था करण्यात आली होती. परदेशातदेखील हाँगकाँग, लंडन आणि न्यूयॉर्क येथे मान्यवर निष्णातांना खास आमंत्रण देऊन एकत्र केले होते. पाहुण्यांना दूरदर्शनवर वित्तमंत्र्यांना सरळसरळ प्रश्न विचारता यावेत अशी व्यवस्था होती.
 ७०% जनसंख्या ज्या व्यवसायात आहे त्या शेतीवर पोट भरणाऱ्यांपैकी कोणाला अंदाजपत्रकात काही स्वारस्य असेल, वित्तमंत्र्यांना काही प्रश्न विचारण्याची त्यांनाही इच्छा असेल असे कुणाला वाटले नाही. शेतकरी, अंदाजपत्रकामुळे आनंदी झाला आहे की दुःखी झाला आहे हे विचारण्याची आवश्यकता आहे, असे दूरदर्शनला वाटले नाही.
 सारा खेळ 'इंडिया'चा

 अंदाजपत्रक म्हणजे थोरामोठ्यांचा खेळ. कारखानदारांना, निर्यातदारांना, आयात करणाऱ्यांना त्यात स्वारस्य. धोतऱ्या शेतकऱ्यांचा त्याच्याशी काय संबंध, असा प्रणव रॉय आणि इतर संयोजकांचा समज असावा.

अन्वयार्थ - एक / २१९