पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अंगण सरळ पाहिजे
 'बॉम्बे क्लब'चा युक्तिवाद थोडक्यात असा, आम्ही स्पर्धेला घाबरत नाही. स्पर्धेचे स्वागत आहे! पण स्पर्धा खिलाडूपणाची पाहिजे. आम्ही मैदानावर उतरण्यास तयार आहोत; पण मैदान सपाट पाहिजे. लेव्हल फील्ड पाहिजे. अशी 'बॉम्बे क्लब'ची मोठी संभावित वाटणारी मागणी आहे.
 रणांगण सपाट मागणारे हे वीर 'नाचता येईना अंगण वाकडे' अशी तक्रार करणारी नाची पोरेच. सपाट मैदानाची आवश्यकता भारतीय कारखानदारांना केव्हापासून पटू लागली?
 तेव्हा कोठे राधासुता!
 महाभारत युद्धात कर्णाने, 'रथाखाली उतरलेल्या रथींवर शरसंधान करणे धर्म नव्हे' असे म्हटले. त्याप्रमाणे कारखानदार आता 'धर्मयुद्धा'ची भाषा करीत आहेत; पण 'कालपुरुष' श्रीकृष्ण त्यांना 'तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म?' असे विचारल्याशिवाय कसा राहील?
 रणांगणावर उतरायचे ते मैदान आपल्या सोयीचे घेऊन, शस्त्रास्त्रे सगळी आपल्या हाती, प्रतिपक्षी निर्बलच ठेवायचे अशी भारतीय कारखानदारांची परंपरा. भर दरबारात निःसहाय द्रौपदीच्या वस्त्राला हात घालण्यात काय ते त्यांचे शौर्य. त्यांना आता एकदम सपाट मैदानाची महत्ता पटू लागली आहे.
 लाडके कारखानदार
 लोकसभेच्या इस्टिमेट कमिटीच्या १२व्या अहवालात, आर्थिक मामल्यांच्या सचिवांची साक्ष आहे, "भारतीय कारखानदारी ही जगातील इतर विकसित कारखानदारी देशांच्या तुलनेने सर्वांत अधिक संरक्षित व्यवस्था राहिली आहे." आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी अनेक पुरावे दिले आहेत. सरकारी संरक्षणाच्या मस्तीत कारखानदारांनी आजपर्यंत गडगंज नफे कमावले. याउलट, नेहरू व्यवस्थेत शेतीची काय दुर्दशा केली? डंकेल प्रस्तावासंबंधी केंद्रशासनाने काही कागदपत्रे सादर केले आहेत. भारतीय शेतकऱ्यांची सबसिडी १० टक्क्यांपेक्षा कमी आहे अशी मोठी शहाजोग भाषा मंत्री, पुढारी वापरत आहेत, "खरे म्हटले तर शेतकऱ्यांना मिळणारी सबसिडी ही ऋणात्मक किंवा उणे आहे," असेही ते कबूल करतात; पण शेतकऱ्यांना मिळणारी 'उलटी पट्टी' किती भयानक होती याचा आकडा मात्र स्पष्ट करण्याचे सगळे साळसूदपणे टाळत आहेत.
 दोडके शेतकरी

 पण GATT समोर बोलता येत नाही. तेथे खरे आकडे मांडावेच लागतात,

अन्वयार्थ - एक / १९२