पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असते. आमच्या साबणात आम्ही ग्लिसरिन ठेवलेले आहे अशी जाहिरात करता येईल; पण येथेही अडचण आली!
 ग्रामोद्योग साबणात ग्लिसरिन राहतच नाही. ते वाहून जाते, गटारात जाते. कारखानदार ग्लिसरिन गटारात जाऊ देत नाहीत, ते वाचवतात, गोळा करतात आणि फायदाही कमावतात. एवढेच नव्हे तर गटारात वाहून गेले असते ते ग्लिसरिन वाचवून राष्ट्रीय अपव्यय थांबवतात. राष्ट्रीय साधनसंपत्तीत भर घालतात.
 अकार्यक्षम ते राष्ट्रहिताचे कसे?
 म्हणजे मोठेच त्रांगडे झाले! गावचा साबण दिसायला अमंगळ, स्वच्छता नावाचीच, रंग फार आल्हाददायक नाही आणि जरा भिजला, की चिखलासारखा मेंदा होणारा. शहरी कारखानदारी साबण गुणांनी चांगला आणि वर राष्ट्रीय संपत्तीही वाचवणारा. मग देशाच्या भल्याकरिता कुटीरोद्योगाचा साबण वापरा असे म्हणायचे कोणत्या आधाराने? गावच्या साबणाला संरक्षण दिले किंवा आंदोलन म्हणून शहरी साबणावर बहिष्कार घातला तर त्यामुळे सगळ्या राष्ट्राचे नुकसान आहे, हे नक्की. ग्लिसरिनच्या रूपाने इतकी संपत्ती गटारात वाहून जाणार!
 साबणाचा ग्रामोद्योग बुडाला तर त्यामुळे गावच्या उद्योजकांचे नुकसान होईल हे खरे; पण त्यामुळे देशाचा तोटा न होता फायदाच होणार आहे. अशा परिस्थितीत ग्रामोद्यागाचे हित वेगळे आणि राष्ट्राचे हित वेगळे असे कबूल करावे लागेल. कारखानदारी साबणामुळे गावची लक्ष्मी शहरात गेली असे म्हणणे चुकीचे. कारखान्याने नवी लक्ष्मी तयार केली. त्या लक्ष्मीचा वाटा गावकऱ्यांना मिळाला नाही, ही गोष्ट वेगळी.
 जे कार्यक्षम नाही ते कृत्रिमरीत्या टिकवले, वाढवले तर त्यात फायदा कोणाचाच नाही. संरक्षण देऊन ग्रामोद्योग टिकवले तर त्यात गावाचाही फायदा नाही, देशाचाही नाही. परदेशांतील आधुनिक तंत्रज्ञान नाकारून शहरातील जुन्या कारखानदारीला संरक्षण देणे यातही कोणाचाच फायदा नाही, हे ओघाने आलेच.

(२३ डिसेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १८८