पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असल्यामुळे. पण ते चिकाटीने एकेक करत कामे मार्गी लावू लागले.
 सुरुंग लावणे, मोठाले खडक उकरून बाहेर काढणे, पिकांसाठी प्लॉट पाडणे, बांध घालणे, पाइप लाइन्स टाकणे, अंतर्गत कच्चे रस्ते तयार करणे, कुंपण घालणे, अशी अगणित कामे होती. सर्वात आधी गरज कामगारांची होती. निदान शे-दीडशे माणसे रोज कामाला लागणार होती. मोठे मोठे खडक उकरून जमीन सारखी करताना आणि विहिरी खणताना त्या खडकांखाली दडलेले लांब लांब, मनगटाएवढे जाड साप चवताळून बाहेर पडत. त्यांच्या पुरातन घरांवरतीच इथे आक्रमण होत होते. साप सापडला नाही असा एक दिवस जात नसे. मजुरांना काम करताना सापांची भीती वाटायची. नाथा भेगडे नावाचा एक माणूस जोशींनी शेतीकामासाठी मुकादम म्हणून नेमला होता. तो रोज फटाफट साप मारत असे.
 शक्यतो पुढच्या चार-पाच महिन्यांत जास्तीत जास्त कामे संपवावीत असे जोशींनी ठरवले होते, कारण नंतर मजुरीला माणसे मिळतीलच अशी खात्री नव्हती. खुद्द आंबेठाणमध्ये भूमिहीन मजूर असे जवळजवळ कोणीच नव्हते; प्रत्येकाची थोडीफार तरी शेती होतीच. पण तरीही स्वतःचे शेतीकाम संपल्यावर अधिकच्या कमाईसाठी सगळेच कुठे ना कुठे मजुरीवर जात. पण आपल्याला गरज असेल तेव्हा ते मजुरीसाठी उपलब्ध असतील याची शाश्वती नव्हती. सुदैवाने रब्बी पिकांचे काम झाल्यावर बहुतेक गावकऱ्यांना फारसे काही काम नसायचेच व त्यामुळे त्या कालावधीत पुरेसे मजूर उपलब्ध झाले. बरेचसे लांब लांब राहणारे कातकरी होते.

 त्यावेळी मुक्काम करता येईल असा शेतावर आडोसा नव्हता. स्वित्झर्लंडहून आणलेली एक स्लिपिंग बॅग जोशींनी इथे आणून ठेवली होती; तशीच वेळ आली तर काहीतरी सोय असावी म्हणून. पण पुण्यातही कामे असायचीच; त्यामुळे जोशी शक्यतो झोपायला औंधला जात. अर्थात रोज न चुकता सकाळी सातच्या आत शेतावर हजर असत. वीजजोडणी, प्लंबिंग, सुतारकाम, गवंडीकाम अशी काही कामे कंत्राटावर दिलेली होती. ती मंडळी आपापले सामान घेऊन येत, आपापले काम करत; पण त्यांच्यावरही लक्ष ठेवावे लागे. बाकी कामे जोशी स्वतःच सांभाळत. एकाच वेळी चारपाच ठिकाणी कामे सुरू असत. जोशी जरा वेळ एका कामावर जायचे, तर जरा वेळाने दुसऱ्या कामावर. प्रत्येक ठिकाणी पाळीपाळीने स्वतः रांगेत उभे राहत, घमेली उचलत, दगडगोटे इकडून तिकडे टाकायचे काम करत. विहीर खणण्याच्या कष्टाच्या कामातही ते हाफ पँट घालून स्वतः खड्ड्यात, चिखलात उतरत. इतरांनाही कामाला हुरूप यावा, ही भावना त्यामागे होतीच; पण आठ वर्षे युरोपात काढल्यावर स्वतःच्या हाताने काम करायची तशी त्यांना सवयही झाली होती. इतर अनेक शहरी सुशिक्षित भारतीयांना वाटते तशी शरीरश्रमांची त्यांना लाज वाटत नसे; आणि शिवाय एकदा एखादे काम स्वतःच्या इच्छेने अंगावर घेतल्यावर सर्व ताकदीनिशी त्याला भिडायचे हा त्यांचा स्वभावच होता. स्वतः मजुरांच्या बरोबरीने काम करण्यात त्यांचा आणखीही एक उद्देश होता. तो म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारणे व त्यातून गावकऱ्यांचे जगणे अधिक चांगले समजून घेणे.

९०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा