पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  सुरुवातीला गावकऱ्यांशी जोशींचा जरा वाद झाला. बाहेरून येणाऱ्या या कातकऱ्यांना मजुरी म्हणून किमान वेतन कायद्याप्रमाणे रोजचे तीन रुपये द्यायचे आणि स्त्री व पुरुष दोघांनाही सारखेच पैसे द्यायचे असे जोशींनी ठरवले होते. त्यांना स्वतःला ही मजुरी अगदी नगण्य वाटत होती. परदेशात काही वर्षे राहिलेल्या व तिथल्या किमतीची सवय झालेल्या माणसाला भारतात आल्यावर इथल्या सर्वच किमती, विशेषतः मानवी श्रमांचे इथले मूल्य, अगदीच नगण्य वाटते, तसाच हा प्रकार होता. पण मजुरीच्या ह्या दरामुळे गावकऱ्यांमध्ये मात्र खळबळ माजली, कारण ते स्वतः त्यांच्या शेतीच्या कामासाठी रोजी फक्त दीड रुपया मजुरी देत होते. "तुम्ही लोकांना इतकी मजुरी देऊन लाडावून ठेवलं, तर आम्हाला आमच्या कामासाठी मजूर कसे मिळणार? तुम्हाला ते परवडत असेल; पण आम्हाला नाही ना परवडणार!" असे त्यांचे म्हणणे होते.

  "मी बाहेरून आलेला माणूस आहे. कायद्याने ठरवून दिली आहे त्यापेक्षा कमी मजुरी मी दिली तर तो गुन्हा होईल. मला ते करणं कसं शक्य आहे?" जोशी त्यांना समजावू लागले.

  गावकऱ्यांना ते पटले नाही, पण त्यांनीही मग तो मुद्दा फारसा रेटून धरला नाही. कारण त्यांच्यातले जे जोशींच्या शेतावर मजुरीला जायचे, त्यांना स्वतःलाही ही वाढीव मजुरी मिळतच होती व हवीच होती. जोशींचे काम संपले, की पुन्हा मजुरीचे दर आपोआपच खाली येतील, अशीही त्यांची अटकळ असावी.

  इथे एक मुद्दा स्पष्ट करायला हवा - शेतकरी व शेतमजूर असा काहीच भेद त्या मजुरांमध्ये नव्हता. ते स्वतः शेतकरीही होते व त्याचवेळी अधिकचे चार पैसे हाती पडावेत म्हणून शेतमजुरीही करत होते. जे फक्त मजुरी करत तेही एकेकाळी शेतकरी होतेच; पुढे कधीतरी त्यांच्या जमिनी कर्जापोटी गहाण तरी पडल्या होत्या किंवा विकल्या गेल्या होत्या. आयुष्यात पुढे जेव्हा काही विचारवंत 'तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा विचार करता, शेतमजुरांचा नाही' असा आरोप करत, तेव्हा आपल्या शेतावरचे हे मजूर त्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहत व असल्या निव्वळ पुस्तकी आरोपातील स्वानुभवावरून कळलेला फोलपणा त्यांना प्रकर्षाने जाणवे.

  गावकऱ्यांना मजुरीचे इतके कमी असलेले दरही परवडत नव्हते ह्याचे कारणही अर्थातच जोशींना साधारण ठाऊक होते आणि येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष अनुभवानेही ते अधिक चांगले कळणार होते - ते कारण म्हणजे गावकरी विकत असलेल्या ज्वारीचा त्यांच्या हाती पडणारा दर त्यावेळी क्विटलला (१०० किलोना) फक्त सत्तर रुपये होता आणि कांद्याचा भाव फक्त वीस रुपये होता!

  ह्या मजुरांचे, विशेषतः कातकरी मजुरांचे दारिद्र्य हृदय हेलावून टाकणारे होते. इथल्या आदिवासींत कातकरी व ठाकर असे दोन समाज मुख्य होते. सगळे तसे विस्थापित. वेगवेगळ्या धरणयोजनांमुळे कोकणातून बाहेर पडून वांद्रेमार्गे इथे आलेले. साधारण निम्मे मजूर पुरुष होते तर निम्म्या बायका. सगळ्यांचीच शरीरयष्टी कृश. लहानपणापासून आबाळ

मातीत पाय रोवताना९१