Jump to content

पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देशात आपण असल्या बाबींचा फारसा विचार करत नाही, पण तेथे शुद्धतेचे निकष खूप काटेकोरपणे पाळले जातात. म्हणूनच त्यांनी इस्राएल व दक्षिण आफ्रिकेतून हे शेंगदाणे मागवायला सुरुवात केली होती. “पण तुम्ही जर हे (अफ्लाटॉक्सिनचे) प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकाएवढे कमी केलेत, तर आम्ही तुमच्याकडूनही माल घ्यायचा विचार करू," असे आश्वासन त्यांनी दिले.
 हे प्रमाण कमी करता येईल का, याविषयी जोशींनी खूप शेतकऱ्यांशी व तज्ज्ञांशी चर्चा केली; पण ते जमेना. शेतकऱ्यांनाही पारंपारिक पद्धतीने पीक काढणे व येईल त्या भावात तेलाच्या घाणींना विकून टाकणे, याचीच सवय झाली होती. आपण पिकाची गुणवत्ता सुधारली तर आपले उत्पन्न खूप वाढू शकेल, हा जोशींचा मुद्दा काही स्थानिक मंडळींना फारसा पटला नाही; किंवा पेलला नाही असे म्हणू या. हे अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकापेक्षाही खूप कमी असलेल्या भुईमुगाचे बियाणे तयार करण्यात पुढे बऱ्याच वर्षांनी, दोन हजार सालानंतर, कच्छमधील भूज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यश आले. असो.

 अशा समृद्ध देशात राहत असतानाही भारतात परतायचे की परदेशातच कायम राहायचे ह्याविषयी जोशीची मन:स्थिती सारखी दोलायमान होत असे. सुरुवातीचे वर्षभर ते तिथे रमले तरी केव्हातरी भारतात परत जावे हा विचारही त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी असायचाच. १९७०मध्ये त्यांचे वडील वारले. त्यावेळी तीन महिन्यांची रजा काढून ते भारतात सहकुटुंब आले होते. भारतात परत जाण्याच्या दृष्टीने थोडी चाचपणी करायचाही त्यांचा उद्देश होता. त्या अनुभवाबद्दल जोशींनी लिहिले आहे. प्रत्यक्ष भेटीतही ते त्याबद्दल बोलले होते. ते म्हणाले,

 "आधी आम्ही साहजिकच पुण्याला गेलो. कारण वडील सेवानिवत्त झाल्यानंतर पुण्यातच सेटल झाले होते आणि तिथेच वारले होते. वडलांचे सगळे दिवसवार वगैरे उरकल्यावर आम्ही प्रवासाला बाहेर पडलो. मुलींना जरा भारत दाखवावा व त्यातून भारताबद्दल त्यांचं चांगलं मत व्हावं, अशी आमची इच्छा होती. कारण कधीतरी भारतात परतायचं अशीच त्यावेळी आमची कल्पना होती. पण मुलींना भारत अजिबात आवडला नाही. दिल्ली, सिमला, आग्रा असा दौरा आम्ही आखला होता. ओळखीच्या एका लष्करी अधिकाऱ्यामळे राहायची उत्तम सोयदेखील करून ठेवली होती. दिल्लीहन सिमल्याला जाताना आम्ही खास डिलक्स बस घेतली होती. पण वाटेत जोराचा पाऊस सुरू झाला व त्या बसचं छत गळू लागलं. वरून अगदी धो धो पाणी पडू लागलं. थेट अंगावर. आम्ही सगळे भिजून चिंब झालो. थंडी जोराची. अगदी काकडून गेलो. चंडीगढची तेव्हा खूप चर्चा होती. नवी वसवलेली राजधानी. तीही कोर्बुसिए ह्या प्रख्यात फ्रेंच-स्विस आर्किटेक्टने. चंडीगढ मुलींना आवडेल अशी आमची कल्पना. पण प्रत्यक्षात त्यांना ते अजिबात आवडलं नाही. एक-दोनदा तेथील बसस्टॉपवरचं टॉयलेट वापरायचा प्रसंग आला. ते इतकं गलिच्छ होतं, की काही बोलून सोय नाही. ते स्वच्छतागृह मुलींनी पाहिलं आणि त्यांचा जीव घाबरा झाल्याचं

डोंगरकुशीतल्या नंदनवनात७१