पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

देशांतर्गत आर्थिक विषमतेचे स्पष्टीकरण हाच आहे.
 अगदी आपल्या मराठीपुरता विचार केला तरी चारुदत्त दाभोळकर यांनी आपल्या पुस्तकात ही भूमिका अगदी १९५४ सालीच (म्हणजे जोशींच्याच नव्हे, तर लिप्टनच्याही खूप पूर्वीच) मांडली होती, ते पुस्तक दत्तप्रसाद दाभोळकरांनी जोशींना दाखवल्यानंतर या मांडणीचे श्रेय जोशींनी चारुदत्त यांना मोकळ्या मनाने दिलेही होते व त्याचा उल्लेख या चरित्रात पूर्वी विस्ताराने झालाच आहे. पुन्हा दाभोळकरांची मांडणीदेखील युरोपात ते शिकत असताना तेथील शेतकऱ्यांकडून त्यांनी जे ऐकले होते, त्यावर आधारित होती; म्हणजे त्यांच्यावेळीही ही मांडणी अगदी 'ओरिजिनल' होती असे म्हणायला वाव नाही – पुन्हा केवळ कोणा एकाचेच नव्हे तर अनेकांचे ते म्हणणे होते; म्हणजेच ती मांडणी बऱ्यापैकी प्रचलित होती.
 प्रस्तुत लेखकाच्या मते भारतीय संदर्भात तरी शरद जोशी यांनीच 'इंडिया'विरुद्ध 'भारत' ही मांडणी प्रथम लोकांसमोर आणली आणि त्यात कारणस्थानी असलेला शेतीमालाच्या शोषणाचा मुद्दा त्यांनीच प्रथम ऐरणीवर आणला; ह्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.
 जोशींनी माणसांचा वापर केला आणि गरज संपल्यावर त्यांना दूर फेकून दिले असा एक आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. डॉ. धनागरे यांच्या उपरोक्त पुस्तकातही (पृष्ठ २५२ वर) तसे म्हटले आहे. त्यात कितपत तथ्य आहे?
 इथे लक्षात घ्यायला हवे, की शेतकरी संघटना, तिच्या आंदोलनात लाखो शेतकरी सहभागी होत असले तरी, एक संघटना म्हणून छोटीच होती. अनेक राज्यांमध्ये तिच्या अनेक शाखा आहेत, शेकडोंचा कर्मचारीवर्ग आहे, ज्याचे तपशिलात व्यवस्थापन करावे लागेल असे अनेक प्रकल्प तिथे चालू आहेत, अशातला काही भाग नव्हता. त्यामुळे इतरांना तिथे तसा मर्यादितच वाव होता. ज्यांना स्वतःची अशी वेगळी प्रतिभा होती, तिला अन्यत्र अधिक वाव मिळेल अशी खात्री होती ते कार्यकर्ते दीर्घकाळ त्यांच्याबरोबर राहणे अवघडच होते. जोशींबरोबर त्यांचे काहीच बिनसले नसते, तरीही ते वेगळे झाले असते. जोशींनी त्यांना वापरून फेकून दिले असे म्हणणे चुकीचे ठरेल.
 स्वतः जोशींचा कार्यकर्त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता?
  जोशींनी याचे उत्तर देताना दोन दृष्टान्त दिले.

 एक होता चित्रकाराचा. एखादा चित्रकार कुंचल्याने चित्र रंगवत जातो, त्याला सुचेल त्याप्रमाणे वेगवेगळे रंग घेऊन त्यांचे फराटे कॅनव्हॉसवर मारत जातो, त्याच्या मनातील कल्पना साकार करत जातो; त्याने मारलेल्या रंगाच्या प्रत्येक फटक्याला (स्ट्रोकला) स्वतःचे असे काही रूप वा महत्त्व असतेच असे नाही; पण त्यांचे एकत्रित रूप जेव्हा चित्रात अवतरते, तेव्हा त्यांना स्वतंत्र असा अर्थ, महत्त्व व रूप लाभत जाते. तसे काहीसे जोशींचे होत गेले. जी जी मंडळी जवळ येत गेली, त्यांना मदतीला घेऊन मनातली संकल्पना ते साकार करत गेले. काय करायचे आहे ह्याची ब्ल्यू प्रिंट त्यांच्यासमोरही तयार नव्हती; अशी कुठली ब्ल्यू प्रिंट समोर ठेवून शेतकरी आंदोलन सुरू झाले नव्हते.


४०२ . अंगारवाटा... शोध शरद जोशींचा