पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

- आज या दिवशी आमच्या जाती जाती जळून गेल्या, राख झाल्या."
 हीच घोषणा शीर्षस्थानी असलेला जोशी यांचा शेतकरी संघटकमधील लेख (६ नोव्हेंबर १९९४ च्या अंकात प्रकाशित) त्यावेळी खूप गाजला होता. पण सर्वस्व पणाला लावून प्रचार केल्यावरही निवडणुकीचा निकाल त्यांच्या विरोधातच लागला. प्रकाश आंबेडकरांना हरवून इंदिरा काँग्रेसचे उमेदवार आणि मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोक चव्हाण हे दणदणीत विजयी झाले.

 पुढे राजकारणात जोशींना त्यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठे असलेले विश्वनाथ प्रताप सिंग भेटले. पहिल्या काही भेटीनंतर दोघांनाही एकमेकांविषयी आदर निर्माण झाला. खूप वर्षांनी योग्य तो साथीदार आपल्याला राजकारणात मिळाला व याच्या साह्याने आपल्याला खूप काही करता येईल असा विश्वास जोशींना वाटू लागला. व्ही. पी. सिंग यांनाही महाराष्ट्रात कोणीतरी व्यापक जनाधार असलेला साथी हवा होता व शरद जोशी ती भूमिका पार पडू शकतील असे त्यांना वाटले. पुढे दोघांनी अनेक वेळा एकत्र प्रवास केला, सभांमधून भाषणे केली व दोघांमध्ये व्यक्तिगत पातळीवरही खूप जवळीक निर्माण झाली. जोशींनी सिंग यांना दिलेल्या पाठिंब्यामागे तो एक भाग होताच, पण त्याशिवाय राजीव गांधींना राजकीय पर्याय उभा करण्याची गरज हा दुसरा धोरणात्मक भागही होताच. त्यावेळी तरी तसा पर्याय म्हणून सिंग सोडल्यास दुसरे कोणीच नव्हते.

 व्ही. पी. सिंग यांची एकूण पार्श्वभूमी इथे विचारात घ्यायला हवी. मूळचे ते उत्तर प्रदेशातील एका राजघराण्यातले. त्यांच्या वागण्यातही एक राजस वृत्ती जाणवत असे. ते कविमनाचे होते, त्यांना चित्रकलेचीही आवड होती. त्याचबरोबर अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यकठोर शासक म्हणूनही त्यांची प्रतिमा होती. इंदिरा गांधींचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. आधी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते; पुढे इंदिराजींनी त्यांना दिल्लीत आणून केंद्रीय व्यापारमंत्री बनवले. पुढे राजीव गांधी सत्तेवर आल्यावर यांचे ते एक निकटचे सहकारी बनले. ३१ डिसेंबर १९८४ ते २३ जानेवारी १९८७ अशी सुमारे दोन वर्षे ते राजीव मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी अनेक बड्या उद्योगसमूहांवर धाडी घालून भ्रष्टाचाराची काही प्रकरणे उघडकीला आणली होती. भुरेलाल या विश्वासू व प्रामाणिक सचिवांची ह्यात त्यांना मोलाची साथ होती. पण त्यामुळे काही उद्योगपती त्यांच्यावर नाराज झाले होते. त्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण राजीवजींनी त्यांची संरक्षणमंत्री म्हणून बदली केली. इथे ते २४ जानेवारी १९८७ ते १२ एप्रिल १९८७ असे जेमतेम साडेतीन महिने होते. पण ह्या अल्प काळातही त्यांनी बोफोर्स प्रकरण बाहेर काढले. स्वीडनमधील बोफोर्स या कंपनीकडून भारतीय सेनेसाठी तोफा खरेदी केल्या गेल्या होत्या व त्या प्रकरणी ६४ कोटी रुपये लाच दिली गेली होती. संशयाची सुई थेट राजीव गांधी यांच्याकडे होती. पुढे वर्षानुवर्षे तपास करूनही सत्य काही उघडकीला आले नाही, पण भ्रष्टाचाराचा हा मुद्दा पुढे करत व्ही. पी. सिंग राजीव मंत्रीमंडळातून बाहेर पडले. काँग्रेस पक्षाचाही त्यांनी राजीनामा दिला.

३३०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा