पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सुरुवातीला अरुण नेहरू व आरिफ मोहमद खान या आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी जन मोर्चा हा पक्ष स्थापन केला; पण पुढच्याच वर्षी ११ ऑक्टोबर १९८८ ह्या जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी त्यांनी स्वतःचा जन मोर्चा, जनता पार्टी, लोक दल, आणि काँग्रेस (एस) ह्या चार पक्षांचे विलीनीकरण करून जनता दल ह्या नव्या पक्षाची स्थापना केली. तिचेच रूपांतर पुढे राष्ट्रीय आघाडी(National Front)मध्ये झाले.
 उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका जाहीर सभेत व्ही. पी. सिंग यांनी आपले बंडाचे शिंग फुकले, तेव्हा त्यांच्या त्या सभेला शरद जोशी खास आमंत्रणावरुन हजर होते. दिल्लीपासून निघालेल्या मोटारींच्या ताफ्यात जोशींना घेऊन जाणारी मोटारही होती. 'व्ही पी सिंग की आयी आंधी, गद्दी छोडो राजीव गांधी', 'राजा नही, फकीर है, देश की तकदीर है' अशा घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला होता. जोशींना व्यासपीठावर मानाचे स्थान दिले गेले होते व त्यांचे भाषणही झाले. हिंदीतही ते खूप प्रभावी बोलले. 'व्ही. पी. सिंग यांनी दुसरे महात्मा गांधी व्हावे आणि भारतातील कच्चा माल स्वस्तात स्वस्त भावात इंडियात नेणारी सध्याची अन्याय्य व्यवस्था बदलावी' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 सिंग यांचे हात बळकट करण्याचा आटोकाट प्रयत्न शेतकरी संघटनेने केला. जोशी यांनी एके ठिकाणी लिहिले होते,

व्ही. पी. सिंग केवळ भ्रष्टाचार दूर करण्यासाठी बाहेर पडलेले नाहीत, तर त्यापेक्षाही व्यापक भूमिका घेऊन ते आपल्यासोबत निघाले आहेत. दिल्लीने आजपर्यंत अनेक राजे पाहिले आहेत. व्ही. पी. सिंगही राजे आहेत. परंतु शेतकऱ्यांना शेकडो वर्षांपूर्वी हरवलेला त्यांचा बळीराजा हवा आहे. व्ही. पी. सिंग यांच्या रूपाने शेतकऱ्यांना हा बळीराजा मिळेल अशी आशा मी बाळगून आहे.

(आठवड्याचा ग्यानबा, २ ते ९ नोव्हेंबर १९८७)

 हीच भावना नंतर जोशींनी आपल्या अनेक सभांमधून व्यक्त केली. सिंग यांच्याकडे जोशी केवढ्या अपेक्षेने बघत होते हे ह्यावरून लक्षात येते.

 ५ सप्टेंबर १९८७ रोजी सटाणा येथे शेतकरी संघटनेने सिंग यांच्याबरोबरची आपली पहिली जाहीर सभा आयोजित केली. पाठोपाठ धुळे, सांगली, कोल्हापूर, लातूर, नागपूर वगैरे अनेक शहरांत लाखालाखांच्या सभा आयोजित केल्या. आपल्या गुजरातमधील मित्रांच्या मदतीने अहमदाबादमधेही जोशींनी सिंग यांच्यासाठी अशीच एक जंगी सभा आयोजित केली होती. सिंग हे सत्तेत उच्च पदी राहिले असले तरी ते लोकनेता असे कधी नव्हते व त्यामुळे या सभांना होणारी प्रचंड गर्दी आणि जोशींची शेतकऱ्यांवरील जबरदस्त पकड बघून सिंग स्तंभितच झाले होते. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता दलाचे उमेदवार ठरवायचे सगळे अधिकार सिंग यांनी जोशीना दिले. जोशी यांची सिंग यांच्याशी असलेली ही जवळीक जनता दलाच्या इतर नेत्यांना, विशेषतः स्थानिक नेत्यांना, खुप सलत असे व त्यांनी पुढे जोशींना बराच त्रासही दिला.

राजकारणाच्या पटावर३३१