तयार केला होता व त्यात ह्या निबंधाचा त्यांनी उल्लेख केला आहे.
या निबंधस्पर्धेतील जोशींच्या यशालाही एक गालबोट लागले होते. विद्यापीठाचे कामकाज कसे चालायचे ह्याचे निदर्शक अशी ह्या स्पर्धेबाबत घडलेली ती घटना इथे नमूद करायला हरकत नाही. पूर्वी जाहीर झालेले पारितोषिकाचे तीनशे रुपये प्रत्यक्षात जोशींच्या हाती पडले नव्हते. नेमकी काय अडचण होती ते कळायला आज काही मार्ग नाही, पण जोशींच्या कागदपत्रांत मुंबई विद्यापीठाच्या रजिस्ट्रारच्या सहीचे एक पत्र म्हात्रे यांना सापडले. त्या पत्रात 'जोशी यांनी पुरस्काराच्या रकमेएवढी, म्हणजे तीनशे रुपयांची, पुस्तके खरेदी करावीत' असे लिहिले आहे. त्यातही तीन अटी आहेत! एक म्हणजे, ही पुस्तके एकाच दुकानातून व एकाच वेळी खरेदी केलेली असावीत; दोन, त्यांच्यावर विद्यापीठाचे नामांकन करण्यासाठी (for stamping the University Coat of Arms in gold') ती सर्व पुस्तके पुस्तकविक्रेत्याने आपल्या बिलासकट विद्यापीठाकडे पाठवावीत; आणि तीन, त्या नामांकनाचा खर्च म्हणून प्रत्येक पुस्तकामागे सहा आणे विद्यापीठ कापेल व तीनशे रुपयांतून ती रक्कम वजा करून उर्वरित रकमेच्या बिलाचे पैसे विद्यापीठाकडून दिले जातील! हा निबंध प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठाने अनुमती द्यावी अशी विनंती जोशींनी तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाकडे केली होती. उपरोक्त पत्रातच त्या अर्जाला उद्देशून रजिस्ट्रारसाहेबांनी कळवले आहे की, "तुमची विनंती विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर विचारार्थ ठेवली जाईल व त्यांचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल."
हे पत्र जोशींना मिळाले तेव्हा ते पोस्टखात्यात नोकरीलाही लागले होते व बडोदा येथे कार्यरत होते! प्रत्यक्षात त्या रकमेची पुस्तके जोशींनी घेतली का, त्यांचे अपेक्षित तेवढे पैसे मिळाले का याची कुठेच नोंद नाही. दुर्दैवाने आज त्या निबंधाचीही प्रत उपलब्ध नाही. सर्वांत आश्चर्यजनक भाग म्हणजे या पत्रावरची तारीख आहे, २३ जानेवारी, १९५९. म्हणजेच निबंधस्पर्धेचा निकाल लागला त्याला तब्बल तीन वर्षे उलटून गेल्यानंतरची! या अविश्वसनीय विलंबाचे कारण काय असू शकेल? नोकरशाहीतील दिरंगाई की आणखी काही?
जोशींच्या कॉलेजजीवनातील एका वेधक प्रसंगाची माहिती जी. आर. दीक्षित या त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना १९ जानेवारी २००२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात वाचायला मिळाली. प्रा. दीक्षित पुढे स्टेट बँकेत खूप वरच्या पदावर गेले व बँकिंग क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. हे सहा पानी स्वहस्ते लिहिलेले पत्र अतिशय वाचनीय असून जोशींचे कागदपत्र चाळताना ते मिळाले. त्यात प्रा. दीक्षित लिहितात,
सिडनम कॉलेजच्या दिवसांत तुमचं माझं जे काही बोलणं होत असे, त्याचे तुकडे तुकडे मला अजून आठवतात. त्याच्या गोड आठवणी मनात रेंगाळतात. अशीच एक आठवण. तुम्ही आणि मी चायनीज कॉन्स्युलेटमध्ये हो चि मिन्हला भेटायला गेलो होतो त्याची. मुंबईतल्या काही तरुण प्राध्यापकांना भेटायची इच्छा हो चि