पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिन्हने प्रदर्शित केली होती. आम्हा सगळ्यांना बोलावणं केलेलं होतं पण प्रा. रणदिवे, प्रा. गाडगीळ वगैरे कोणी आले नाहीत. त्यांना असा सल्ला दिला गेला होता की 'तुम्ही जर हो चि मिन्हला भेटलात, तर सरकारदप्तरी त्याची नोंद होईल व मग तुम्हाला अमेरिका किंवा इंग्लंडला जायची स्कॉलरशिप मिळणं अडचणीचं होईल.' मला अमेरिका किंवा इंग्लंड या देशांच्या वारीचं इतकं कौतुक नव्हतं. मी मनाशी म्हटलं, की हो चि मिन्हसारखा जगविख्यात माणूस आपल्याला भेटू इच्छितो आहे, तेव्हा ही संघी काही आपण सोडायची नाही. त्याची ती मूर्ती व राहणी पाहून मला खूपच बरं वाटलं. बोटीवरच्या वेटरचा ड्रेसच त्याने घातला होता व बोलताना तो म्हणाला, की अशा कपड्यांचाही फक्त एकच जोड त्याच्याकडे आहे. तो असंही म्हणाला, 'आमचा देश गरीब आहे. त्यामुळे आमच्या हातात राजसत्ता जरी असली, तरी आम्ही गरिबीतच राहिलं पाहिजे. तसं राहिलो, तरच आम्ही त्यांच्यातले आहोत असं लोकांना वाटेल.' Acceptance through identification' या मूलतत्त्वाचाच त्याने पुनरुच्चार केला होता. त्यानी गांधी व औरंगझेब यांच्या साधेपणे राहण्याची वाखाणणी केली. उठता उठता तो म्हणाला, माझ्या आयुष्याची सुरुवात मी बोटीवरचा वेटर म्हणून केली व नंतर बरीच वर्षे मी तीच नोकरी केली. त्यामुळे माझी राहण्याची पद्धत ठरून गेली आहे. त्यात बदल करावा असं मला कधी वाटलं नाही. पुढच्या आयुष्यात अनेक नामवंत लोकांना मी भेटलो; पण हो चि मिन्हची ही आठवण माझ्या मनात चिरंतन राहिलेली आहे.

 व्हिएतनामच्या या क्रांतिकारक भाग्यविधात्याला भेटणे, विशेषतः त्या काळात, हा नक्कीच एक रोमांचकारक अनुभव असला पाहिजे. जोशींच्या लेखनात किंवा बोलण्यात या भेटीचा कुठेच कसा उल्लेख झाला नाही, याचे काहीसे नवल वाटते.  हो चि मिन्ह यांचे बलाढ्य अमेरिकेविरुद्ध जिद्दीने उभे ठाकलेले एक कडवे साम्यवादी म्हणून दीक्षित यांना खूप कौतुक वाटले होते, पण वैचारिक पातळीवर दीक्षित कायमच खुल्या अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. याच पत्रात त्यांनी विद्यार्थिदशेत असतानापासूनच जोशींवर अ ॅडम स्मिथ वगैरे अभिजात (क्लासिकल) अर्थशास्त्र्यांचा प्रभाव कसा होता व तेव्हापासूनच जोशीही मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक कसे होते याचाही कौतुकाने उल्लेख केला आहे. जगदीश भगवती व अशोक देसाई यांच्यासारख्या मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक राहिलेल्या त्यांच्या काही इतर विद्यार्थ्यांचाही ते उल्लेख करतात. हा सगळा १९५२ ते १९५८ हा कालखंड आहे; जेव्हा उदारीकरण वगैरे शब्दही भारतात फारसे वापरात नव्हते व सोव्हिएतप्रणीत समाजवादी विचारांचा पगडा सर्वव्यापी होता. पण नवल म्हणजे त्या विद्यार्थिदशेपासूनच जोशी यांच्यावर खुल्या (लिबरल) विचारसरणीचा प्रभाव होता. त्या पत्रात दीक्षित लिहितात,

 "आज जेव्हा मी माझे बहुसंख्य विद्यार्थी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन व

३४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा