पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी स्वतःही आपापल्या पत्नीच्या नावे शेतजमीन केली व त्याचाही परिणाम इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांवर होत असे असेही त्या म्हणतात. पुराणकथांचा व पौराणिक प्रतिमांचा जोशींनी केलेला प्रभावी वापर व श्रोत्यांच्या हृदयाला हात घालणारे त्यांचे वक्तृत्व यांचाही उल्लेख त्यांना केला आहे. स्वतः जोशी यांनी किश्वर यांच्या या अभियानातील योगदानाची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. ते म्हणतात,
 "अशा अनेक सभांमधून किश्वर स्वतःही रडू लागत. एखादा पुरुष स्त्रियांची बाजू इतक्या प्रभावीपणे मांडू शकतो, हे त्यांना पूर्वी कधीच खरे वाटले नव्हते असेही त्या म्हणत."
 दिल्लीत मधु किश्वर यांची त्यांच्या घरी १८ मार्च २०१६ रोजी भेट झाली, तेव्हा या उपक्रमातील आपल्या सहभागाबद्दल त्या भरभरून सांगत होत्या. पंचवीसएक वर्षे उलटून गेली तरीही त्या वेळच्या त्यांच्या आठवणी अजूनही सुस्पष्ट आहेत.

 अशाच एका गावभेटीत घडलेला हा एक प्रसंग. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील रावेरी हे छोटे गाव. जोशी जेव्हा तिथे गेले तेव्हा इतरत्र व्हायची तशी इथेही एक मोठी सभा झाली. त्यानंतर नेहमीप्रमाणे गावकऱ्यांशी गप्पा रंगल्या. रामाने सोडून दिल्यानंतर सीता वनवासात गेली, दंडकारण्यातच ती प्रसूत झाली व लवकुशांचा जन्म झाला, इथवरची कहाणी तशी सर्वपरिचित आहे. रावेरी गावात त्या कहाणीचा पुढचा विलक्षण भाग जोशींना ऐकायला मिळाला.
 त्या कहाणीनुसार लवकुश जन्मले ते याच परिसरात. प्रसूतिश्रमांनी थकलेल्या सीतेने थोडी लापशी करून प्यावी म्हणून इथल्या गावकऱ्यांकडे मूठभर गहू मागितले. पण कोणीही ते तिला दिले नाहीत. आपल्या नवजात मुलांना आपण आता आपले दुधही देऊ शकणार नाही ह्या कल्पनेने संतापलेल्या सीतेने गावाला शाप दिला की 'या परिसरात गहू कधीच उगवणार नाही.' अनेक शतके इथे गहू खरोखरच कधी पिकला नाही. खूप शतकांनी संकरित वाण आल्यानंतर गावात गहू पिकायला लागला.
 जवळच एक हनुमानाचे मंदिरही आहे. इथला नऊ फुटी भव्य हनुमान दोरीने बांधलेल्या अवस्थेत आहे. असा हतवीर्य हनुमान अन्य कुठेही बघायला मिळत नाही. त्यामागेही गावकरी एक कथा सांगतात. रामाने अश्वमेध यज्ञ केला असताना त्याचा घोडा लवकुशांनी इथे अडवला. घोड्याबरोबर आलेल्या हनुमानाला त्यांनी हरवले व बांधून ठेवले. त्याचेच प्रतीक म्हणजे ही मूर्ती.
 अशा प्रकारच्या पौराणिक कथांची सत्यासत्यता जोखणे हे तसे अशक्यप्राय. दंडकारण्य नेमके कुठे होते, लवकुश नेमके कुठे जन्मले, हे कोण आणि कसे सिद्ध करणार? पण साधारणतः लोककथा ह्या गावाचा गौरव सांगणाऱ्या असतात व ही कथा तर गावाविषयी वाईट सांगणारीच होती आणि तरीही ती सांगितली जाते, हा ती खरी असण्याचा एक अल्पसा पुरावा आहे असे जोशींना वाटले.

 देशात राममंदिरे जागोजागी आहेत, पण सीतेचे मंदिर हे एकमेव; ह्या मंदिराचा जीर्णोद्धार

३०२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा