पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तेरा मार्च, वेढ्याचा दुसरा दिवस. राजभवनासमोरच एक मोक्याची जागा शोधून दुपारी तिथे सभा झाली व त्या सभेत महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांना निरोप देण्यात आला. त्यांना पुन्हा लांबचा प्रवास करून आपापल्या घरी परतायचे असल्याने दुसऱ्या दिवशी त्यांना परतायची परवानगी द्यायची हे पूर्वीच ठरले होते. काही कार्यकर्ते मात्र तिथेच राहणार होते. ह्या लढ्यातला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सहभाग खूप वाखाणला गेला. मुळात त्यांचा सहभाग हाच पंजाबच्या शेतकऱ्यांना फार मोठा आधार वाटला. 'देशातील शेतकरी सारे एक आहेत' ही भावना त्यातून अधोरेखित होत होती व तेच त्यांच्या सहभागाचे मुख्य कारण होते. 'महाराष्ट्रात जेव्हा असे आंदोलन होईल, तेव्हा आम्हीही तुमच्यामागे असेच उभे राहू' असे आश्वासन जवळजवळ प्रत्येक वक्त्याने मंचावरून दिले.
 चौदा मार्च. वेढ्याचा तिसरा दिवस. वातावरणातील चुळबुळ आता वाढली होती. पण पंजाब शासन दाद देईना; शेतकरीनेत्यांशी बोलणी करण्यासाठी पुढे येईना. सरकारला कदाचित वाटले असावे, की आपण दोन-तीन दिवस दुर्लक्ष केले, तर कंटाळून शेतकरी आपोआपच वेढा उठवून आपापल्या गावी परततील. पण मागण्या मान्य झाल्याखेरीज वेढा उठवायचा नाही हा शेतकऱ्यांचा निर्धार कायम होता. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली. आसपासच्या गावांतून शिदोरी जमवायला सुरुवात झाली. दूध येऊ लागले. फळे येऊ लागली. ट्रॅक्टर्स भरभरून खाद्यपदार्थ येऊ लागले. शेतकऱ्यांनी मिळतील त्या लाकडी फळकुटांचा व कार्डबोडींचा वापर करत आपापल्या कच्च्या झोपड्या उभ्या केल्या. एक किसाननगरच तिथे उभे राहिले.
 पंधरा मार्च. वेढ्याचा चौथा दिवस. आज सकाळपासूनच वातावरण एकदम तंग झाले. वेढ्याच्या कालावधीत राजभवन न सोडण्याचे आश्वासन राज्यपालांनी पाळले नाही. त्या पहाटे अचानक ते गुपचूप बाहेर पडले. लुधियानामधील एका कार्यक्रमासाठी ते गेले होते. रेडियोवरील बातम्या ऐकताना ही बातमी आंदोलकांना कळली. ते खूपच चिडले. तीन-चार तासांनी राज्यपाल परत आले. त्या दोन्ही वेळी राज्यपालांच्या अनुपस्थितीत राजभवनावरील ध्वज उतरवून ठेवणे, त्यांच्या मोटारीवर राष्ट्रध्वज व लाल दिवा लावणे, पुढ्यात सायरन वाजवत जाणारी गाडी असणे, राजभवनाच्या मुख्य प्रवेशदारावर राज्यपाल आत नाहीत हे सूचित करणारी नेहमीची पाटी लावणे वगैरे सोपस्कार पाळले गेले नव्हते. दरम्यानच्या काळातील तणाव तोवर खूप वाढला होता. पण जोशी व इतर नेत्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. आपल्या भाषणात जोशी म्हणाले,
 “राज्यपाल उंदरासारखे बिळातून बाहेर आले असले आणि परत बिळात घुसले असले तरी आपण काही मांजर नाही. आपल्याला उंदीर-मांजराचा खेळ खेळायचा नाही, त्यांचा पाठलाग करायचा नाही. आपले आश्वासन त्यांनी पाळले नाही, उंदरासारख्ने पळून गेले, तरी आपण आपली पायरी सोडायची नाही. शेवटी राज्यपाल हा थेट राष्ट्रपतींचा प्रतिनिधी आहे ह्याची जाणीव ठेवून आपण संयम पाळू या."

 अतिशय कौशल्याने जोशींनी ती परिस्थिती हाताळली व शांतता कायम राखली.

२६४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा