पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'जाना है, जाना है, चंडीगढ जाना है' अशा घोषणाही तेव्हा दिल्या गेल्या. कार्ल मार्क्सने ज्याप्रमाणे 'जगातल्या कामगारांनो, एक व्हा' असा नारा दिला होता व त्याद्वारे वर्गजाणीव (class consciousness) निर्माण करायचा प्रयत्न केला होता, तसाच काहीसा हा जोशींचा प्रयास होता. शेतकरी, मग तो महाराष्ट्रातील असो की पंजाबातील, हा शेवटी एकाच आर्थिकसामाजिक वर्गातला आहे, आपली सुखदुःखे परस्परांशी जोडली गेलेली आहेत, ही जाणीव संघटनेच्या कार्यकर्त्यांत निर्माण होणे गरजेचे होते. त्यातून त्यांचे स्वतःचे क्षितिज खूप रुंदावणार होते.


 १२ मार्च १९८४पासून चंडीगढ येथे सुरू झालेले हे आंदोलन म्हणजे केवळ पंजाबमधील शेती आंदोलनातीलच नव्हे, तर एकूणच शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील एक मानबिंदू आहे. पुढचे सलग सहा दिवस चंडीगढ येथील पंजाबच्या राजभवनला जवळजवळ एक लाख शेतकऱ्यांनी घेराव घातला होता. त्यात हिंदू आणि शीख आपले सगळे मतभेद विसरून सामील झाले होते. त्यावेळी पंजाबात उफाळलेल्या धार्मिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ह्या आंदोलनाचे अनन्यसाधारणत्व अधिकच उठून दिसते.
 मुख्यतः हे आंदोलन विजेच्या दरवाढीविरुद्ध होते. अर्थात विजेव्यतिरिक्त इतरही मागण्या होत्याच. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळावा, शेतीमालाच्या विक्रीवरची झोनबंदीसारखी बंधने उठवावीत, आपल्या विकासाला योग्य असे आधुनिक बियाणे, यंत्रे, तंत्रज्ञान वापरण्याचे किंवा आयात करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य शेतकऱ्याला असावे वगैरे.
 पंजाबी शेतकऱ्याच्या दृष्टीने वीजपुरवठा ही एक कायमची डोकेदुखी बनून राहिली होती. शेतीतील कूपनलिका, पंप, मोटारी, थ्रेशरसारखी इतर उपकरणे यांचा वापर तिथे भरपूर. त्यासाठी वीज ही अत्यावश्यक. पण वीजपुरवठा मात्र कमालीचा अनियमित. त्यातून ग्रामीण भागातील वीज ही बहुतेकदा रात्री पुरवली जायची. कधीही ती खंडित व्हायची. काळोखात शेतात काम करणे अशक्य होई. साप, अन्य जीवाणू चावायची भीती असे. याउलट शहरी भागात वीज दिवसा पुरवली जाई; ते शहरवासीयांना व मुख्यतः कारखान्यांना सोयीचे असे. पण त्यांची सोय पाहणारे सरकार ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांची सोय मात्र पाहत नाही याचाही राग शेतकऱ्यांच्या मनात होता. विजेचे दरही कमी करावेत म्हणून आदले दीड वर्ष शेतकरी मागणी करत होते, पण पंजाब शासन दाद देत नव्हते; उलट सरकारने ते दर वाढवायचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात शेवटी राजभवनला घेराव घालायचे ठरले होते.

 पंजाबात ह्या घडामोडी चालू असताना इकडे महाराष्ट्रात परभणीतील आवाहनाला साद म्हणून झपाट्याने शेतकरी पुढे येऊ लागले. 'पंजाबात सगळीकडे आग पेटली आहे, तिथे जाऊन उगाच कशाला जीव धोक्यात घालता?' असा सल्ला देणारेही बरेच होते, पण त्यांना न जुमानता, स्वखर्चाने, जाणाऱ्यांची संख्या बघता बघता अकराशेवर जाऊन पोचली.

अटकेपार२६१