पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शेवटी एकदाचा दीर्घकाळ प्रतीक्षा असलेला १२ मार्चचा दिवस उजाडला. सकाळी नऊच्या सुमारास सारे मराठी शेतकरी चंडीगढला परेड ग्राउंडवर जाऊन पोचले. तोवर इतरही शेतकरी मोठ्या प्रमाणावर येऊन पोचले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच तिथे शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे दाखल होऊ लागले होते.
 चंडीगढला पोचल्यावर मराठी शेतकऱ्यांना संगरूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गटात समाविष्ट केले गेले. ह्या गटाचे नेतृत्व महाराष्ट्राशी बऱ्यापैकी परिचित असलेले बलबीरसिंग राजेवाल ह्यांच्याकडे होते. त्यांच्यासोबत भास्करराव बोरावके, रामचंद्रबापू पाटील, शेषराव मोहिते, नरेंद्र अहिरे, भाऊसाहेब इंगळे, बद्रीनाथ देवकर, चंद्रकांत वानखेडे व विजय जावंधिया हे होते. त्याशिवाय ताराबाई तानाजी पवार (पिंपळगाव दबडे), पार्वतीबाई यादव नाईकवाडे (येवला) व प्रभावतीबाई महादेव केळकर (पाथर्डी) या महिला कार्यकर्त्याही होत्या. विशेष म्हणजे सतत १३ दिवस सायकलने प्रवास करीत वर्धा जिल्ह्यातील नऊ तरुणही ह्या आंदोलनासाठी जवळपास दीड हजार किलोमीटर्सचा प्रवास करून आले होते. जमलेल्या सर्वच आंदोलकांनी त्यांचे भरपूर कौतुक केले. 'पंजाब का बुलावा है, महाराष्ट्र आज आया है' असे लिहिलेले स्वागतपर फलक रस्त्यावर जागोजागी लावले होते. महाराष्ट्रातून आलेल्या जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांचा पंजाबात यायचा, किंबहुना महाराष्ट्राबाहेर पाय ठेवायचा हा पहिलाच प्रसंग होता. साहजिकच सगळ्यांचा उत्साह दांडगा होता. चंडीगढच्या दर्शनाने सगळे अगदी भारावून गेले होते.
 चंडीगढ आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग असलेले शेतकरी संघटनेचे विदर्भातील एक नेते चंद्रकांत वानखडे यांनी शेतकरी संघटक(६ एप्रिल १९८४)मध्ये चक्षुर्वैसत्यम हकीकत नोंदवलेली आहे. त्यानुसार राजभवनापर्यंत शेतकऱ्यांना पोचताच येऊ नये म्हणून लांबलांबून येणाऱ्या शेतकऱ्यांना चंडीगढच्या वेशीवरच रोखण्याचा पोलिसांनी आधी प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांची संख्या प्रचंड होती, त्यांच्या लाटाच्या लाटा चंडीगढमध्ये शिरत होत्या व एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवणे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर पोलिसांनी तो प्रयत्न सोडून दिला. वेगवेगळ्या मोरर्च्यांनी शेतकरी राजभवनसमोरच सेक्टर सतरामध्ये असलेल्या विशाल परेड ग्राउंडवर जमू लागले. त्यांची संख्या दुपारी दोनपर्यंत जवळपास एक लाखावर गेली होती. बहुसंख्य शेतकरी अर्थातच पंजाबमधील होते; पण हरयाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. त्यांच्यासोबत आलेले जवळजवळ दोन हजार ट्रॅक्टर्स व ट्रेलर्स परेड ग्राउंडच्या भोवताली पसरले होते. अधूनमधून माइकवरून पंजाबी गीते सादर केली जात होती. काही जण रेडियो ऐकत होते. काहींजवळ टेपरेकॉर्डर होते; त्यांवरून गुरुबाणी ऐकवली जात होती. खाण्यासाठी आंदोलकांनी बरोबर कायकाय आणले होते! त्याचाही समाचार घेणे सुरू होते. वेगवेगळे गटनेते आपापल्या अनुयायांसमोर छोटी-छोटी भाषणेही करत होते.

 १० ऑक्टोबर १९८३ ते २९ सप्टेंबर १९८५ या कालावधीत पंजाबात अस्थिरतेमुळे राष्ट्रपतींची राजवट होती. राज्यपाल बी. डी. पांडे हेच सर्व निर्णय घेत होते. त्या दिवशी दुपारी

२६२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा