पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अधिकृत भाग होता हेही नंतर जोशींनी दाखवून दिले. ऊस आंदोलनाविषयी लिहिताना तो सारा भाग विस्ताराने आलाच आहे.
 म्हणूनच शेतकरी गरीब आहे ह्याबद्दल जोशी मुख्यतः चुकीच्या सरकारी धोरणांना जबाबदार धरतात; गावोगावच्या सावकारांना वा जमीनदारांना ते त्याबद्दल दोषी धरत नाहीत. जोशींच्या मते त्यांच्याविरुद्ध द्वेष पसरवण्याचे काम अनेक विचारवंतांनी व विशेषतः साम्यवादी नेत्यांनी वर्षानुवर्षे केले आहे. जणू काही त्यांच्या शोषणामुळेच शेतकरी दरिद्री राहिला आहे! काही आंदोलनांत त्यांचे प्राणही घेतले गेले. जोशी म्हणतात,
 "शेतकऱ्यांच्या दुःखाचं खरं मूळ दीडदमडीच्या सावकार, जमीनदारांत नाही. वाघाने शिकार मारल्यानंतर त्यावर हात मारणाऱ्या खोकडांपलीकडे त्यांना काही महत्त्व नाही. पण आजवर शेतकरी आंदोलनांना आर्थिक विचार, ऐतिहासिक तत्त्वज्ञान नसल्यामुळे त्यांची दिशा चुकली. कुत्र्याला कोणी दगड फेकून मारला, की ते कुत्रं धावत जाऊन चेवाचेवाने दगडालाच चावतं, तसं ह्या शेतकरी आंदोलनांचं झालं.जेव्हा जेव्हा ग्रामीण भागात उद्रेक उभे राहू लागले, तेव्हा तेव्हा ते ग्रामीण भागातीलच एखाद्या घटकाविरुद्ध - सावकार, जमीनदार, एखादी जात, एखादी पात, एखादा धर्म यांच्याविरुद्ध वळवून देण्यात आले. प्रचंड ताकदीच्या पहिलवानास लहान पोराने जणू चलाखीने फसवलं!"
 शेतकरी तितुका एक एक' हे जोशींचे एक महत्त्वाचे सूत्र होते. आपल्या कार्यकर्त्यांच्या मनावर ते पक्के बिंबवायचा जोशींनी प्रयत्न केला. धर्म, जात, भाषा, राज्य ह्यांवर उभे राहणारे कुठलेही तत्त्वज्ञान हा क्षुद्रवाद आहे; आपले आंदोलन हे पूर्णतः अर्थवादी आहे; साचलेल्या पाण्यात किडे साठतात, तसे विकास खुंटलेल्या समाजात हे सगळे क्षुद्रवाद निर्माण होतात; आपण त्यांपासून नेहमीच दूर राहायचे, असे ते म्हणत.
 छोटा शेतकरी-मोठा शेतकरी हा भेदही त्यांना अमान्य होता. त्यांच्यामते एखाद्याची शेती ६० एकर असली व त्याला तीन मुले असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला २० एकरच उरतात आणि त्यांना पुन्हा प्रत्येकी दोन मुले झाली, की प्रत्येकाचा वाटा फक्त १० एकराचा उरतो, पुढच्या पिढीत तोही कमीच होतो. आजोबा बागाइतदार, बाप मोठा शेतकरी, मुलगा छोटा शेतकरी आणि नातू शेतमजूर असाच (जर ह्यापैकी कुणी शेतीतून बाहेर पडून दुसरा काही व्यवसाय करू लागले नाही तर) बहुतेकदा प्रकार असतो. त्यामुळे जवळ जवळ सगळे भारतीय शेतकरी हे अल्पभूधारकच आहेत असे ते म्हणतात.
 शेतकरी व शेतमजूर हा भेदही ते स्वानुभवाच्या आधारावर अमान्य करतात. मुळात छोटा शेतकरी हाच केव्हातरी आपली शेती गमावून बसतो व शेतमजूर बनतो; त्यामुळे त्यांच्यात मूलगामी असा काही भेद नसतोच. शेतकरी व शेतमजूर ह्यांच्यात त्यामुळेच सामंजस्याचे नाते असते, स्वतः शेतकरी व त्याचे कुटुंबही ह्या शेतमजुराबरोबर शेतावर राबत असते, बांधावर बसून सगळे एकत्रच भाकरी खात असतात. आंबेठाणच्या शेतीत त्यांनी हे अनुभवलेच होते. स्वतःच्या फायद्यासाठी काही विचारवंत हा कृत्रिम भेद निर्माण करतात. जोशी म्हणतात,


२४० = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा