पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "शेतकरी विरुद्ध शेतमजूर हा भेद निर्माण करायचा आणि आपण शेतमजुराच्या बाजूला आहोत असं दाखवायचं, हा विचारवंतांचा भंपकपणाच असतो. त्या तथाकथित शेतमजुराविषयीदेखील त्यांना खरंतर काहीच जिव्हाळा नसतो. स्वतःच्या घरात हेच विचारवंत आपल्या मोलकरणीशी कसं वागतात ते एकदा बघा! तिला चहा देतानादेखील ते तो कुठल्यातरी जुन्या, कानतुटक्या कपातून देतात आणि जिन्याखालच्या एखाद्या कोपऱ्यात बसून प्यायला लावतात! अशा लोकांनी उगाच शेतकरी विरुद्ध शेतमजूर असा खोटा वाद पेटवू नये!"
 'शेतकरी तितुका एक एक' असे म्हणताना आपले आंदोलन ग्राहकविरोधी नाही हेही जोशी ठासून सांगतात. शेतीमालाचे भाव वाढले म्हणजे पर्यायाने महागाई वाढत जाईल, असे शहरी मध्यमवर्गीयांना वाटत असते. शेतकरी आणि ग्राहक यांच्यात भांडणे लावून द्यायचा प्रयत्न काही राजकारण्यांकडून वरचेवर होत असतो. अशा वेळी उत्पादक शेतकरी हाही एक ग्राहकच आहे, आपल्या शेतात काढलेली दोन-चार पिके सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी तोही इतर सर्वांप्रमाणे बाजारातूनच खरेदी करत असतो ह्या मुद्द्यावर ते भर देतात.
 या संदर्भात आणखी एका गोष्टीकडे जोशी लक्ष वेधून घेतात. ती म्हणजे बहुतेक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या एकूण विक्रीमूल्यात कच्च्या मालाचा खर्च हा अगदी नगण्य घटक असतो. उदाहरणार्थ, दीडशे रुपयांच्या कपड्यामागे कापसावरचा खर्च फक्त पंधरा रुपये असतो अथवा एकशे दहा रुपयांच्या विड्यांमागे तंबाखूवरचा खर्च फक्त पाच रुपये असतो. त्यामुळे कच्च्या मालाची किंमत वाढली तरी एकूण तयार वस्तूंच्या किमतीत फारशी वाढ व्हायचे काहीच कारण नाही. मुळातच ह्या तयार वस्तूंची विक्रीची किंमत इतकी भरमसाट आहे, की कच्चा माल खरीदण्यासाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागले, तरी एकूण विक्रीच्या किमतीत अगदी नगण्य फरक पडेल.
 शेतीमालाला रास्त दाम हवा ही आपली मागणी चलनवाढीला (व पर्यायाने भाववाढीला) कारणीभूत ठरेल हे काही अर्थशास्त्र्यांचे म्हणणे जोशी खोडून काढतात. त्यांच्या मते ही चलनवाढ फक्त शेतीमालाचे भाव वाढल्यामुळे होते असे नसून, कर्मचाऱ्यांचे व कामगारांचे पगार सतत वाढत असल्यामुळेही ती होत असते. शिवाय त्यांना महागाईनुसार वाढणाऱ्या महागाईभत्त्याचे कवच असते, जे शेतकऱ्यांना नसते. ते म्हणतात,
  "चलनवाढीच्या पुराचे पाणी वाढतच आहे. शेतकरी सोडून बाकी सगळे पाण्याच्या पातळीबरोबर तरंगत वर चढू शकतात. शेतकऱ्याचे पाय मात्र खाली बांधून ठेवले आहेत. त्याच्या खांद्यावर उभे राहून इतर सर्व आपली डोकी पाण्याच्या वर ठेवत आहेत आणि तोही वर आला तर आपण बुडू, म्हणून ओरडा करत आहेत."
 ह्या शिबिरांत आपल्या आंदोलनतंत्राची विस्तृत चर्चा जोशींनी केली. सरकारची शक्ती किती प्रचंड आहे ह्याची पूर्ण कल्पना त्यांना होती. ते म्हणतात,


शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी. २४१