पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



उत्पादनखर्चाएवढा भाव मिळतो अशी नोंद होती. याउलट कापसाला जागतिक बाजारपेठेमध्ये जर २१० रुपये भाव असेल, तर त्या वेळी देशात कापूस खरेदी महासंघ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) शेतकऱ्याला १०० रुपये भाव देऊ करतो.
 थोडक्यात, सरासरीने भारतात कापसाला ११० रुपयांची उलटी पट्टी आहे, हा निष्कर्ष निघाला. महाराष्ट्रातील विदर्भासारख्या प्रदेशात तर एकाधिकाराखाली शेतकऱ्याना प्रती क्विटल ६० रुपयेसुद्धा मिळत नाहीत असेही त्या तक्त्यात स्पष्ट म्हटले होते. पुढे एकदा ह्या निगेटिव्ह सबसिडीची, म्हणजे उलट्या पट्टीची, दाहकता जोशींनी एका कार्यक्रमात भेट झाली असताना, मुखर्जीसाहेबांच्या लक्षात आणून दिली. ते हसत हसत म्हणाले, “आणि तरीही आमचे विरोधी पक्ष म्हणतात, की जागतिक व्यापार संस्थेच्या दबावाखाली आमच्याकडील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिड्या सरकार कमी करेल!"
 म्हणजेच, जागतिक दडपणाखाली शेतकऱ्यांच्या सबसिड्या कमी करू नका, अशी जेव्हा काही नेते व विचारवंत मागणी करत होते, तेव्हा प्रत्यक्षात अशा कुठल्या सबसिड्या नव्हत्याच, तो केवळ एक आभास होता, याचीही जाणीव त्या मंडळींना नव्हती. प्रत्यक्षात सरकार शेतकऱ्यांकडूनच पैसे ओरबाडून घेत आले आहे, हे आमच्या विरोधी पक्षांच्यासुद्धा कधी लक्षात आले नव्हते!
 कापूस आंदोलनाविषयी लिहिताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी लिहिणे आवश्यक वाटते, कारण या आत्महत्यांचे प्रमाण कापूस शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक आहे. खरेतर हा एखाद्या स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे आणि त्यावर इथे थोडक्यात काही लिहिणे विषयाला न्याय देणारे असणार नाही. तरीही शेतकरी आत्महत्या हा अलीकडे वरचेवर चर्चेत येणारा विषय असल्याने शरद जोशी ह्या विषयाकडे कसे पाहत होते, याचे कुतूहल वाचकाला वाटणे स्वाभाविक आहे.
 अनेक शहरी वाचकांत शेतकरी आत्महत्यांबद्दल बरेच गैरसमज प्रचलित असतात. उदाहरणार्थ, 'सरकारकडून लाख-दोन लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी म्हणून काही जण मुद्दाम आत्महत्या करतात.' किंवा 'आता आपल्या कुटुंबाला मदत म्हणून आपण काहीच करू शकत नाही; तेव्हा निदान आत्महत्या करून तरी त्यांना चार पैसे मिळवून द्यावे असाही विचार ह्या आत्महत्यांमागे आहे' असे काही जणांना वाटते. हे म्हणणे सत्याचा विपर्यास करणारे आहेच, पण ते अतिशय क्रूरदेखील आहे.

 आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून जी रक्कम जाहीर होते तिच्यातले किती पैसे प्रत्यक्षात त्या कुटुंबीयांपर्यंत पोचतात व किती पैसे मधल्यामध्ये हितसंबंधी हडप करतात हा एक संशोधनाचाच विषय आहे. पण अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जगण्याची प्रेरणा ही माणसाची सर्वांत प्रबळ प्रेरणा आहे व कोणी कितीही पैसे दिले म्हणून एखादा माणूस आत्महत्या करेल हे अशक्य कोटीतले वाटते. मुळात आत्महत्या करणे एवढे सोपेही नाही.

पांढरे सोने, लाल कापूस ◼ २१३