पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



जोशींनी ह्या आत्महत्यांचा खूप खोलात जाऊन विचार केला होता व ह्या समस्येची काही कारणे आणि काही मूलगामी उपाय त्यांनी सुचवले आहेत. (बळीचे राज्य येणार आहे., पृष्ठ ३५४ ते ३७४)
 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंबंधी जोशींनी केलेली मीमांसा थोडक्यात पुढीलप्रमाणे होती :

१) देशभरात आजवर घडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत सर्वाधिक आत्महत्या कापूस

उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. शेजारच्या आंध्रातील शेतकरी आत्महत्या नकली कीटकनाशके अथवा बियाणे यांच्यामुळे झालेल्या नुकसानीतून प्रेरित झाल्या होत्या. पण महाराष्ट्रात अशा भेसळीचे प्रमाण नगण्य आहे व म्हणून ते महाराष्ट्रातील आत्महत्यांमागचे प्रमुख कारण मानता येणार नाही. इथले प्रमुख कारण हे कापूस उत्पादनात वर्षानुवर्षे येत

गेलेल्या तोट्यात आहे.

२) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांपैकी बहुतेक सर्वजण जमीनमालक शेतकरी आहेत; भूमिहीनमजूर नाहीत. तेव्हा 'आम आदमी'च्या नावाखाली 'जमीन सुधारणांचा अभाव' वगैरे 'पुरोगामी' कारणे देऊन बरेच विद्वान करतात तशी या आत्महत्यांची कारणमीमांसा करणे बाष्कळपणाचे होईल.

३) बहुतेक आत्महत्याग्रस्त शेतकरी सहकारी बँकांच्या पठाणी वसुलीने त्रस्त झालेले होते.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याने बहुतेकदा सहकारी सोसायट्यांकडून कर्ज घेतलेले असते व त्याच सर्वाधिक क्रूरपणे कर्जवसुली करतात. ग्रामीण भागात व्यापारी बँका कर्जवसुलीसाठी फारशी दांडगाई करत नाहीत; लोकांचा फार रोष ओढवून घेण्याची त्यांची मानसिकताही नसते. खासगी सावकारदेखील फारशी पठाणी वसुली करण्याची हिंमत करत नाहीत; त्यांना गावात राहायचे असते आणि पाण्यात राहून माशांशी वैर घेण्याची त्यांची हिंमत होत नाही. त्यामुळे खासगी सावकारीच्या विरोधात पुनःपुन्हा आळवले जाणारे आणि आता खूप जुने गुळगुळीत झालेले समाजवादी अवडंबर निरर्थक आहे. किंबहुना, 'सावकारांची सालटी काढू' अशी भाषा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केल्यामुळे अनेक गावांमधून कर्ज द्यायचा व्यवसाय करणाऱ्या सावकारांनी शेतकऱ्यांना कुठलेही कर्ज देणे बंद केले; एवढेच नव्हे, तर अशा गावांतून दुकानदारदेखील शेतकऱ्यांना उधारीवर माल देईनासे झाले. ह्यात सर्वाधिक हाल गरजू शेतकऱ्याचेच होत असतात. कर्जवसुलीकरिता मालमत्तेवर जप्ती आणणे, शेतकऱ्याला धमकावणे अशी दांडगाई प्रत्यक्षात फक्त सहकारी संस्थांच्या वसुली अधिकाऱ्यांकडून होते. आपल्या मागे राजसत्ता उभी आहे अशा खात्रीने ही सहकारी संस्थांची पदाधिकारी मंडळी कर्ज थकलेल्या शेतकऱ्यावर अनन्वित जुलूम करतात. शेतकऱ्याला सर्वाधिक जाच ह्या मंडळींकडून होत असतो.

४) कर्जबाजारी झालेला शेतकरी वर्षानुवर्षे निसर्गाशी आणि शासनाशी झगडा देत हरल्यानंतर


२१४ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा