पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



ना? मग हा मोर्चा महिलांचा कसा म्हणता येईल?'
 "आम्हाला हा प्रश्न म्हणजे एक आव्हान वाटलं. आम्ही त्याच क्षणी जाहीर केलं, की महिलाच ह्या बैलगाड्या चालवतील. २७ ऑक्टोबर १९८६ हा मोर्च्याचा दिवस होता. आदल्या दिवशी ही घटना घडलेली. मी इतर महिलांना जेव्हा हे सांगितलं, तेव्हा त्या सगळ्या काळजीत पडल्या. कारण बैलगाडी हाकणं तसं अवघड होतं. त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून मी म्हटलं, 'पहिली बैलगाडी माझी असेल व ती मीच हाकणार आहे.'
 "माझा निश्चय बघून पाचतरी महिला बैलगाड्या हाकत येतील असं मला वाटलं. प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी २५० बैलगाड्या मोर्च्यात आल्या! हाकणाऱ्या सगळ्या महिलाच होत्या. कलेक्टर कचेरीसमोरचा सगळा रस्ता जाम झाला. तासभर तरी आम्ही तिथे होतो. सगळं गाव आश्चर्यचकित होऊन ते दृश्य पाहत राहिलं. त्यात ते पत्रकार बंधूही होते! हातात बैलांचे कासरे धरून सगळ्या बायका जोरजोरात घोषणा देत होत्या!
 "ह्या सगळ्यातून आंदोलनाला पूरक अशी जागृती होत होती. पुढचा सगळा पंधरवडा आम्ही रेल रोकोचा प्रचार करण्यात व कोणकोण कुठुनकुठुन येणार याचं नियोजन करण्यात घालवला. आम्हाला पकडायला पोलीस टपलेच होते आणि आम्ही गनिमी काव्याने त्यांची नजर चुकवून प्रचार करत फिरत होतो. आंदोलक आणि पोलीस ह्यांच्यात जणू पाठशिवणीचा खेळच सुरू होता. १० आणि ११ डिसेंबर ह्या शेवटच्या दोन दिवसांत आम्ही निदान १५ गावांमधून फिरलो.
 "शेवटी एकदाची बारा तारखेची सकाळ उगवली. सकाळी सहा वाजल्यापासूनच बाहेरगावाहून शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे वर्ध्यात शिरत होते. एवढी गर्दी वर्ध्याने कधीच पहिली नव्हती. जास्तीत जास्त लोकांना पोलीस पकडत होते; पण बाहेरून येणाऱ्या माणसांची संख्याच एवढी मोठी होती, की कितीही जणांना पकडलं तरी नवे नवे आंदोलक रेल्वे लाइनीच्या दिशेने पुढे सरकतच होते. रेल्वे रोकोची वेळ दुपारी ११ ते २ अशी ठरली होती. त्यानुसार ते तीन तास आम्ही ती सगळी रेल्वे लाइन अडवून धरली होती.
  "दोननंतर मात्र साहेबांनी पूर्वीच देऊन ठेवलेल्या आदेशानुसार रेल रोको थांबलं. संध्याकाळी पाचनंतर पकडलेल्या सगळ्यांना पोलिसांनीही सोडून दिलं. एवढ्या सगळ्या पंधरा-वीस हजार आंदोलकांना अटकेत ठेवण्याची काहीच सोय वर्ध्यात नव्हती. आमच्या मागण्यांकडे समाजाचं व सरकारचं लक्ष वेधून घेणं हा अशा कुठल्याही आंदोलनामागचा मुख्य हेतू असतो व तो ह्यावेळेपर्यंत सफळ झाला होता. रेल रोकोची ती यशस्वी सांगता होती."
 बहुतेक सारे कार्यकर्ते त्यावेळी तुरुंगात असल्याने ह्या रेल रोकोची बरीचशी जबाबदारी महिला कार्यकर्त्यांवर पडली. आदल्याच महिन्यात चांदवड येथे संघटनेचे ऐतिहासिक असे महिला अधिवेशन झाले होते. त्यावेळी असंख्य शेतकरी महिला पेटून उठल्या होत्या व पुरुषांच्या बरोबरीने आंदोलनात सहभागी होण्याचा निश्चय त्यांनी केला होता. हे रेल रोको म्हणजे त्या निश्चयाची एक कसोटीच होती आणि त्या कसोटीत ह्या शेतकरी भगिनी पूर्ण यशस्वी झाल्या.

२०८ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा