पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जोशींनी या घरात मुक्काम केला, पण ते अगदी कुटुंबाचा एक हिस्सा असल्यासारखेच राहिले. सरोजताईंच्या म्हणण्यानुसार सकाळी नास्त्याचा त्यांचा आवडता प्रकार म्हणजे शिपोतु - शिळ्या पोळीचे तुकडे! तिखटमीठ लावून तेलाची फोडणी दिलेले! घरच्या सगळ्यांशी जोशी खेळीमेळीने वागायचे. सरोजताईंच्या सासूबाई, म्हणजे अक्का, जोशींना आपला मोठा मुलगाच मानू लागल्या.
 पुढे सरोजताई शेतकरी संघटनेच्या तिकिटावर काँग्रेसच्या प्रभा राव यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून विधानसभेवर निवडूनही गेल्या. महिलांचा व शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेत उठवण्याची एकही संधी त्यांनी तिथे सोडली नाही. संघटनेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष.
 त्यांचे यजमान रवी काशीकर गरिबीतून वर आलेले. स्वतः शेती पदवीधर. घरची शेतीही होतीच, पण हे इतर मित्रांच्या भागीदारीत बियाणांच्या व्यवसायात पडले. व्यवसायाची घडी चांगली बसत होती, त्याचवेळी ते शेतकरी आंदोलनाच्या संपर्कात आले व आपल्या व्यवसायातून वेळ काढत त्यांनी संघटनेचे काम केले. त्यांचे व्यवसायातील सहकारी माधव शेंबेकर हेदेखील प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग नसला, तरी संघटनेच्या कामाचे महत्त्व जाणणारे. अंकुर सीड्स ही त्यांची कंपनी बीजनिर्मिती व वितरणाच्या क्षेत्रात एक आघाडीची कंपनी मानली जाते. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या घराला खूपदा 'आमचं वर्ध्यातील राजभवन' असे म्हणतात. तीस-चाळीस कार्यकर्त्यांच्या पंगती ह्या घराला नवख्या नाहीत.
 “माझ्या जाऊबाई - शालूताई - घरची सगळी जबाबदारी घेत होत्या, म्हणूनच मला संघटनेचं इतकं काम करता आलं. त्यामुळे त्यांचंही योगदान माझ्याइतकंच आहे. मी कुठेही दौऱ्यावर गेले, तुरुंगात गेले तरी मला कधी माझ्या मुलांची, घराची काळजी करावी लागली नाही." - इति सरोजताई.
 ह्या शालूताईंचा भाऊ अरुण ह्याच्याबरोबर, मागे ज्यांचा उल्लेख झाला आहे त्या, सुरेगावच्या अंजली पातुरकर यांचे लग्न झाले आहे.
 आपल्या ह्या रेल रोकोतील अनुभवाबद्दल सरोजताई म्हणाल्या,

 "हे रेल रोको म्हणजे एका मोठ्या कापूस आंदोलनाचाच एक भाग होता. ते आंदोलन त्यापूर्वीच सुरू झालं होतं. १९८६ साली कापसाचा भाव कमी न करता निदान मागील वर्षाएवढा तरी ठेवावा या मागणीसाठी जिल्ह्याजिल्ह्यात कलेक्टरच्या कार्यालयावर मोर्चे काढायचं ठरलं. आमचा वर्धा जिल्हा म्हणजे शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला. महिला आघाडीचं कामही इथे भरपूर झालं होतं. त्यामुळे इथला मोर्चा हा फक्त महिलांचा असावा व तो बैलगाड्यांतून निघावा असं ठरलं. पुर्वी असं कधीच घडलं नव्हतं.
  "आम्ही मोर्च्यांचा भरपूर प्रचार केला. तिगाव, आमला, रोठा, दहेगाव, म्हसाला अशा आठ-दहा किलोमीटर अंतरावरील गावांतूनही लोक यायला तयार झाले. एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला, 'महिलांचा मोर्चा म्हणता व तो बैलगाडीतून निघणार म्हणता. पण मग बायका बैलगाडीत मागे बसणार आणि बैलगाड्या हाकणारे पुरुषच असणार, असं

पांढरे सोने, लाल कापूस ◼ २०७