पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजवादी नेते नानासाहेब गोरे ह्याच्या हस्ते ही होळी लावली जाणार होती. पण पतितपावन संघटनेला (ती जातीयवादी आहे या भूमिकेतून) असलेल्या विरोधामुळे ते आले नाहीत. दिल्लीतील वेठबिगार मुक्तिमोर्चा संस्थेचे नेते स्वामी अग्निवेश यांनी शेवटी ही होळी पेटवली. त्यानंतर झालेल्या सभेत पतितपावन संघटनेचे अध्यक्ष सोपानराव देशमुख, स्वामी अग्निवेश, विजय जावंधिया व शरद जोशी यांची भाषणे झाली. एकूणच पुणे शहरात शेतकरी संघटनेचे जाहीर कार्यक्रम असे फारच थोडे झाले; त्यांतला हा एक.
 १२ डिसेंबर हा हुतात्मा बाबू गेनू सैद ह्याचा स्मृतिदिन. याच दिवशी, १९२९ साली, मुंबईतील मुळजी जेठा ह्या कापडाच्या मोठ्या घाऊक मार्केटसमोर, विदेशी कापडांवर बहिष्कार टाकण्याच्या महात्मा गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार कामगारांची जोरदार निदर्शने चालू होती. बाबू गेनू हा त्यांच्यातला एक. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुगे पडवळ ह्या गावच्या एका शेतकऱ्याचा मुलगा. मुंबईतील एका कापड गिरणीत काम करणारा. विदेशी कापडांनी भरलेला एक ट्रक मार्केटमधून बाहेर पडला व रस्त्यावर आला. तो रोखून धरण्यासाठी बाबू गेनू त्या ट्रकसमोर सरळ आडवा पडला. ट्रक ड्रायव्हरने ट्रक थांबवला. शेजारीच बसलेल्या एका गोऱ्या सोजिराने ट्रक तसाच सरळ पुढे रेटून नेण्याचा आदेश दिला. पण त्या देशी ड्रायव्हरने तसे करायला नकार दिला. चिडलेल्या सोजिराने त्याला खाली उतरवले व स्वतःच ट्रक सुरू करून त्याने सरळ बाबू गेनूच्या अंगावरून ट्रक नेला. स्वातंत्र्यआंदोलनातील हा मुंबईतला पहिला हुतात्मा. १९८५मध्ये त्याच्या स्मृतिदिनी शेतकरी संघटनेने मुंबईतील शिवाजी पार्कवर एक विशाल शेतकरी-कामगार मेळावा आयोजित केला. ह्या ऐतिहासिक मैदानावरचा संघटनेचा हा पहिला मेळावा. डॉ दत्ता सामंत ह्यांच्या कामगार आघाडीसमवेत हा मेळावा आयोजित केला गेला होता.
 या मेळाव्यात शिवसेनेनेही सामील व्हावे अशी जोशींची फार इच्छा होती व त्यासाठी त्यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण दिले होते. पण 'ज्या व्यासपीठावर दत्ता सामंत असतील, त्या व्यासपीठावर मी येणार नाही' असे म्हणत ठाकरे यांनी नकार दिला. शिवसेना आणि दत्ता सामंत यांची कामगार आघाडी यांच्यात त्यावेळी वेगवेगळ्या कारखान्यांतील कामगारांचे नेतृत्व कोणी करायचे या मुद्द्यावरून सतत मारामाऱ्या होत असत. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती व छगन भुजबळ महापौर होते. ठाकरे येणार नाहीत म्हटल्यावर त्यांचीही यायची आधी तयारी नव्हती; पण शेतकरीनेत्यांनी ‘एवढे सगळे शेतकरी मुंबईत येणार व मुंबईचे पहिले नागरिक म्हणून त्यांचे स्वागत करणे हे तुमचे कर्तव्य आहे' असे म्हणत त्यांची मनधरणी केली. त्यामुळे ते यायला तयार झाले. मैदान पूर्ण भरले होते व त्यात शेतकऱ्यांची संख्याच खूप अधिक होती. पण सामंतांनी आपल्या चार-पाचशे महिला कामगार व्यासपीठाच्या समोरच आणून बसवल्या होत्या. या महिलांनी सतत शिवसेनाविरोधात जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. इतर सर्व शेतकरी श्रोत्यांना शिवसेना व कामगार आघाडी ह्यांच्यातील ह्या वैराची काही माहितीही नव्हती


१९८ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा