पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 रविवार, ६ ऑक्टोबरला नगर जिल्ह्यात राहुरी येथे ऊसउत्पादकांची एक परिषद आयोजित केली होती. संघटनेने सर्व राजकीय पक्षांना परिषदेचे आमंत्रण दिले होते. सत्तारूढ काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आधी यायचे कबूल केले होते; पण मग त्यांनी ते रहित केले. तुमच्या रस्ता रोको ह्या प्रकाराला माझा विरोध आहे असे म्हणत. आपली भूमिका त्यांना समजावून सांगण्यासाठी मुंबईला त्यांच्या घरी जाऊन स्वतः शरद जोशी त्यांना भेटले, पण वसंतदादा तयार झाले नाहीत. बहुधा दिल्लीहून त्यांना ताकीद मिळाली असावी. इतर सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मात्र परिषदेला हजर होते.
 याही कार्यक्रमात सुरुवातीला राजीवस्त्रांची होळी करण्यात आली. त्यानंतर दुपारी सभा सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. अगदी धो धो पाऊस पडू लागला. शेतकरी संघटनेच्या नेत्यांप्रमाणेच शरद पवार, प्रमोद महाजन व माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग हे नेतेही व्यासपीठावर हजर होते. पावसामुळे सभा आटोपती घ्यावी लागते की काय, अशी भीती काही जणांनी व्यक्त केली. अशा वेळी शरद जोशी माइकपाशी गेले. "सभा चालू राहणार आहे, कोणीही उठू नये," असे त्यांनी जाहीर केले. आश्चर्य म्हणजे समोर बसलेल्या जवळपास दोन लाख श्रोत्यांपैकी एकही जण उठला नाही! मुसळधार पावसातच ती सभा उत्तम पार पडली. शेतकऱ्यांवरील जोशीची पकड किती अभेद्य होती ह्याचे एक प्रात्यक्षिकच सर्वांना पाहायला मिळाले. "हम ने काफी सारी मीटिंग्स देखी है, मगर ऐसा जबरदस्त माहोल कभी नहीं देखा था" असे उद्गार ह्या सभेनंतर चरणसिंगांनी काढले होते.
 ह्या सभेत एक आगळा उपक्रम जाहीर केला गेला. पारंपरिक 'रास्ता रोको' करण्याऐवजी १० नोव्हेंबरला सर्वांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहावे, प्रत्येक वाहन थांबवून चालकाला एखादे फूल व पान द्यावे आणि त्याचवेळी शेतकरी संघटनेचे आंदोलन कशासाठी आहे हे सांगणारे एक पत्रक द्यावे; त्यातून वाहतूक हळू झाली तरी 'रास्ता रोको' होणार नाही, व शिवाय लोकांचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल अशी त्यामागची भूमिका होती. 'फूल-पान आंदोलन' असे ह्या आगळ्या आंदोलनाला नाव देण्यात आले व पुढे त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. माहितीपत्रकाबरोबरच नामवंत व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी चितारलेल्या चार खास व्यंग्यचित्रांचे एक पत्रकही वाहनचालकांना दिले गेले. त्या पत्रकाच्या दहा लाख प्रती संघटनेने छापून घेतल्या होत्या.

 कापूस आंदोलनाच्या दरम्यान असाच एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम ७ ऑक्टोबरला पुण्यात आयोजित करण्यात आला. बरोबर ८० वर्षांपूर्वी, म्हणजे ७ ऑक्टोबर १९०५ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात लकडी पुलाजवळ नदीकाठी विदेशी कपड्यांची एक होळी लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. पतितपावन ही संघटना दरवर्षी त्याच जागी सावरकरांचे स्मरण म्हणून तशीच एक होळी साजरी करत असे. या वर्षी त्या संस्थेसोबत शेतकरी संघटनादेखील ह्या कार्यक्रमात सामील झाली. दुसऱ्या एखाद्या संस्थेबरोबर अशा कार्यक्रमात शेतकरी संघटनेने सामील व्हायचा हा पहिलाच प्रसंग. ज्येष्ठ

पांढरे सोने, लाल कापूस ◼ १९७