पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व हे काय घडते आहे याची त्यांना काहीच कल्पना येईना. संघटनेच्या सर्व सभा नेहमी विलक्षण शिस्तीत पार पडत. महिला कामगारांनी या घोषणा थांबवाव्यात अशी सूचना जोशींनी सामंत यांना अनेकदा केली, सामंत यांनी वरवर आपल्या कार्यकर्त्यांना दटावण्याचे नाटकही केले, पण प्रत्यक्षात ह्या घोषणा चालूच राहिल्या.
 मुळात भुजबळ यांना बोलवायलाच सामंत यांचा विरोध होता, पण जोशींनी आग्रह धरल्यामुळे त्यांनी नाराजीने होकार दिला होता. त्याकाळी भुजबळ यांची शिवसेनेत घुसमट व्हायला सुरुवात झाली होती; पण अधिकृतरीत्या ते शिवसेनेतच होते. कदाचित बाळासाहेबांच्या मनाविरुद्ध ह्या मेळाव्याला हजर राहून त्यांना आपली नाराजी व स्वतंत्र बाणा बाळासाहेबांना दाखवायचा होता.
 त्यांच्या येण्यामुळे एक फायदा नक्की झाला - शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याला हार घालण्यासाठी जी शिडी लागायची, ती त्यावेळी फक्त मंबई महानगरपालिकेकडे होती व तिचे एका दिवसाचे भाडे तीस हजार रुपये होते. भुजबळ आल्यामुळे ती फुकटात मिळाली! त्या मेळाव्याचा इतर सर्व खर्च संघटनेने फक्त तीस हजार रुपयांतच बसवला होता! 'मुर्दाबाद'च्या घोषणांनी वैतागलेल्या भुजबळांनी आपले स्वागतपर भाषण झाल्यावर ताबडतोब व्यासपीठ सोडले, पुढील भाषणांसाठी ते थांबले नाहीत.
  या मेळाव्याच्या आदल्या दिवशी हुतात्मा बाबू गेनूच्या महाळुगे-पडवळ या गावापासून एक स्मृतिज्योत यात्रा मुंबईत आणली गेली होती. त्या यात्रेत इतरांबरोबर बाबू गेनूच्या थोरल्या वहिनी श्रीमती कासाबाई कुशाबा सैद यांचाही समावेश होता. त्यांच्याच हस्ते या मेळाव्यात त्यांनी बरोबर आणलेल्या स्मृतिज्योतीने राजीवस्त्रांची होळी पेटवण्यात आली होती. अशा वेगवेगळ्या कल्पक कृती हे शेतकरी संघटनेच्या सगळ्याच कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्य होते.
 भुजबळ निघून गेल्यावर या सभेत प्रकाश आंबेडकर, दत्ता सामंत व शरद जोशी यांची भाषणे झाली. शरद जोशी यांची मुंबईतील ती पहिली मोठी सभा. नंतरही कधी त्यांच्या मुंबईत अशा मोठ्या सभा झाल्या नाहीत. त्यावेळचे जोशी यांचे एक खंदे सहकारी धुळ्याचे अनिल गोटे यांचा ह्या आंदोलनात मोलाचा वाटा होता. या मेळाव्यातील त्यांच्या संदर्भातील एक गमतीदार आठवण जोशींनी नोंदवली आहे. ते लिहितात :

स्टेज उभारायचे आणि लाऊड स्पीकरचे काम कामगार आघाडीच्या कुणी चारपाच लाख किंवा अशाच काही रकमेला ठरवले होते. गोटेंनी तीस हजारात हे काम करायचा प्रस्ताव आणला, तेव्हा डॉक्टरसाहेब (दत्ता सामंत) त्यांच्या सहकाऱ्यांवर एकदम घसरले. डॉक्टरसाहेबांना राग आला म्हणजे त्यांच्या तोंडी शिव्यांच्या फैरीच्या फैरींची खैरात चाले. 'एवढे समोरासमोर XXXX मला गंडवता? या गोटेमुळे समजलं. गेली इतकी वर्षं तुम्ही कितीला लुटलं कुणास ठाऊक!' डॉक्टर सामंतांचा अनिल गोटेंवर मोठा लोभ जडला. 'एवढा तुमचा कार्यकर्ता आम्हांला देऊन टाका', असा त्यांचा आग्रह कायम असे. माझ्याशी भेटणे, बोलणे त्यांना

पांढरे सोने, लाल कापूस &#9724 १९९