पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 निर्यातबंदी हटवावी म्हणून १ मार्च १९८०पासून शेतकऱ्यांनी चाकणमध्ये 'रास्ता रोको' सुरू केले. प्रत्यक्ष रस्ता अडवायचा प्रकार ह्या वेळी आंदोलनात प्रथमच घडला. तसे पाहिले तर ह्यापूर्वी अनेकदा बाजारात सतत पडणारे भाव पाहून जोशी बाजारपेठेसमोर भाषणे करत, कमी भावात कांदा न विकण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करत. काही जण त्यांचे म्हणणे मानत, काहींना आपल्या गरजेपोटी येईल त्या भावाने कांदा विकणे भाग पडे. आपल्या भाषणांचा काही परिणाम होत नाही हे पुन्हा पुन्हा पाहिल्यावर वैतागलेले जोशी म्हणत, "आपण सगळे चाकणवरून जाणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग अडवून धरू. तसे केले की सगळीकडे खळबळ माजेल व आपल्या मागणीची दखल घेणे सरकारला भाग पडेल. चला, तुम्ही सगळे या माझ्या मागे."

 एवढे बोलून जोशी स्वतः चालू लागत. सुरुवातीला उत्साहाने ६०-७० शेतकरी त्यांच्या मागोमाग बाजारपेठेपासून हमरस्त्यापर्यंत यायला निघत. पण मग एकेक करत ते गळून पडत. कोणाला घरी जायची घाई असायची, कोणाला गावात उरकायचे दुसरे काही काम आठवायचे. खरे म्हणजे बहतेकांना अशा काही आंदोलनाची सवयच नव्हती. ते शासनाबरोबरच्या कुठल्याही प्रकारच्या संघर्षाला घाबरत. त्यापेक्षा आपल्या अडचणी सहन करणे व कसेतरी दिवस रेटून नेणे हेच पिढ्यानुपिढ्या त्यांच्या अंगवळणी पडले होते. जेव्हा महामार्गापर्यंत जोशी पोचत, तेव्हा जेमतेम सात-आठ जण जोशींसोबत उरलेले असत व इतक्या कमी जणांनी रस्ता रोखून धरण्याचा प्रयत्न करणे शक्यच नसायचे.

 असे पूर्वी खूपदा झाले होते व त्यामुळे ह्या वेळेला तरी शेतकरी कितपत प्रतिसाद देतील ह्याविषयी साशंकता होती. पण गेल्या काही महिन्यांत शेतकरी संघटनेने बऱ्यापैकी जागृती केली होती. त्यामुळे त्या १ मार्चला चांगले चार-पाचशे शेतकरी घोषणा देत देत त्यांच्यामागे जाऊ लागले. सगळ्यांनी महामार्गावर येऊन रस्त्यावर बैठक मारली. दोन्ही बाजूंनी जाणारीयेणारी वाहने थांबली. जोरजोरात घोषणा सुरू झाल्या होत्या. वातावरण तंग झाले.

 जवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तयारच होता. वरून हुकूम येताच पोलिसांनी भराभर रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांना ओढत ओढत वाहनांमध्ये कोंबले. जे प्रतिकार करत होते त्यांना लाठ्यांचे तडाखे खावे लागले. पंधरा-वीस मिनिटांत रस्ता मोकळा झाला. एकूण ३६३ शेतकरी पकडले गेले; दुसऱ्या दिवशी त्यांना जामीनावर सोडण्यात आले. अर्थात आंदोलनाची तीव्रता कमी झाली नाही. ५ मार्चच्या आत शासनाने कांदाखरेदीच्या भावाबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास ५ मार्चपासून आपण आमरण उपोषण सुरू करू असे जोशींनी जाहीर केले.

 शेवटी ५ मार्चच्या सकाळी सरकारने ५० ते ७० रुपये भावाने कांदा खरेदी करायचे जाहीर केले; पण प्रत्यक्षात मात्र त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. नाइलाजाने ८ मार्च रोजी जोशींनी आपले आयुष्यातले पहिले बेमुदत उपोषण सुरू केले.

 लीलाताईंनाही त्यांनी त्याबद्दल काहीच कळवले नव्हते. त्यांना ते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पेपरात वाचल्यावर कळले. लीलाताई त्यामुळे खूपच नाराज झाल्या. त्यांनी लगोलग

१३४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा