पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवूनच ते ह्या प्रचारकार्यात सामील झाले होते. मतदारसंघातील जवळ जवळ प्रत्येक गावात ते गेले. शेतकरी प्रश्न समजून घेण्यासाठी व पुढे सोडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त असे संपर्क जोशी साधत होते. मामांचे भाषण चालू असताना मागे उभे राहून वा गर्दीत मिसळून ते सगळे निरखून पाहत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव, अपेक्षा व अडचणी ऐकून घेत. 'हा माणूस इतर शहरी सुशिक्षित लोकांपेक्षा वेगळा आहे' असे त्या भागातील शेतकऱ्यांच्या मनावर ठसू लागले. त्यावेळी मामा म्हणत, "आम्ही राजकारणी चाकणहून दिल्लीला जाण्यासाठी धडपडतो आणि शरद जोशी मात्र परदेशातून येतात आणि चाकणहून टोकाच्या वांद्रे गावाला जाण्याचा ध्यास धरतात."
 जोशी म्हणतात, “या त्यांच्या शेऱ्यामध्ये माझ्या पुढच्या सगळ्या शेतकरी चळवळीच्या इतिहासाचे बीज आहे."
 पुढे कांदा आंदोलनात मामा शिंदे सर्व ताकदीनिशी सामील झाले. ते स्वतः आयुष्यभर समाजवादी पक्षाचे काम करत आलेले; त्या पक्षाच्या विचारसरणीला जोशी यांचा अगदी मुलभूत असा विरोध. तरीही दोघे एकत्र काम कसे करू शकतात याचे अनेकांना आश्चर्य वाटे. पण "शरद जोशींचा विचार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार आहे व आजवर तो तसा कोणीही मांडला नव्हता. अशा वेळी त्यांना साथ देणं हे माझं एक शेतकरी म्हणून कर्तव्य आहे," असे मामा म्हणत. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते एसेम जोशी व नानासाहेब गोरे यांनी आणि शरद जोशी यांनी व्यापक शेतकरीहित विचारात घेऊन एकत्रितपणे काही कृती करावी अशी त्यांची फार इच्छा होती व त्यादृष्टीने त्यांनी खूपदा प्रयत्नही केले होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे शेतकरी संघटनेच्या चाकणमधील एक-दोन सभांना नानासाहेब गोरे व जॉर्ज फर्नांडीस हजर राहिले होते. पण जोशींबरोबर समाजवाद्यांचे, किंवा खरे तर कुठल्याच पक्षाचे, फारसे कधी जुळले नाही.

 प्रचारसभांच्या धामधुमीतून मोकळे झाल्यावर एप्रिल १९७८पासून जोशी पुन्हा एकदा आपल्या शेतीवर लक्ष केंद्रित करू लागले. एकूण परिस्थिती आता खूप गंभीर झाली होती. आर्थिक टंचाई होतीच, काही कौटुंबिक ताणतणावही होते. जोशी आपल्या शेतीतील प्रयोगांत पूर्ण रमले असतानाच लीलाताईंनी गुलाबाची रोपे विकणारी रोपवाटिका सुरू केली होती. मुख्य म्हणजे स्वतःची एक पोल्ट्री सुरू केली होती. काहीतरी स्वतंत्र व्यवसाय उभा करण्याची त्यांची जिद्द होती. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण त्यांनी खडकी येथील शासकीय कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्रातून घेतले होते. खूप मनापासून त्या हा व्यवसाय करत होत्या. अंड्यांचे आहारातील वाढते महत्त्व म्हणजे मोठीच व्यावसायिक संधी होती. पुणे-तळेगाव हे कुक्कुटपालनाचे एक मोठे केंद्र म्हणून विकसित होत होते. सुरुवात त्यांनी मृद्गंध बंगल्यातूनच केली होती, पण नंतर व्याप वाढू लागल्यावर व त्या निवासी जागेत व्यवसाय वाढवणे शक्य नसल्याने त्यांनी कोंबड्यांचे सगळे पिंजरे अंगारमळ्यात नेले. चाकणच्या अप्पा देशमुखांनीच हे पिंजरे तयार केले होते व ते ठेवण्यासाठी पत्र्याच्या शेडदेखील त्यांनीच उभारून दिल्या होत्या.

१०४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा