पान:अंगारमळा (Angarmala).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कामगार आघाडीही मंचावर असावी अशी योजना होती; पण डॉक्टर सामंतांनी मध्येच एक खोडा घातला. "शेतकरी संघटना आणि कामगार आघाडी यांचा अधिकृतरीत्या संयुक्त मोर्चा किंवा एखादा पक्ष तयार झाला पाहिजे. त्यासंबंधी सर्व तपशील कागदावर उतरवून जाहीर घोषणा झाली पाहिजे.” असा त्यांनी आग्रह धरला. आम्ही याबाबत खूप सावधगिरीने वागत होतो. इतर राज्यांतील शेतकरी आंदोलनांना राजकारणाबद्दलचे फार कठोर वावडे होते. 'बैठकीत घोषणा करायच्या आणि आठ दिवसांत घटस्फोट घ्यायचा यातून काहीच साध्य होत नाही. त्यापेक्षा, आपण एकत्र कामाला लागू; एकत्र काम करता करता एकमेकांचे विचार जास्त चांगले समजू लागतील आणि यथावकाश संघटना, आघाडी किंवा राजकीय पक्ष यांचा विचार करता येईल,' अशी आमची मांडणी. त्या काळी संघटनेचे पुण्यात जंगली महाराज रोडवर कार्यालय होते. एक दिवस डॉक्टरसाहेब सहकाऱ्यांसह मोठ्या थाटाने आले. "संयुक्त घोषणेवर सही, नाहीतर पंढरपूरच्या मेळाव्यात सहभाग नाही," अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली; मग बोलणेच खुंटले. 'साकडे मेळावा' झाला; भरघोस झाला. डॉक्टरसाहेबांनी अंग काढून घेतले. त्याचे खरे कारण राजकीय भूमिकेसंबंधी मतभेद हे मला आजही पटत नाही. कामगार आघाडीची फारशी माणसे पंढरपूरपर्यंत यायची नाहीत व संघटनेच्या जमावापुढे त्यांची उपस्थिती नगण्य होईल आणि एकूण आंदोलनात कामगार आघाडीचे स्थान दुय्यम राहील अशी त्यांना धास्ती वाटत असावी. जगभरात अनेक देशांत शेतकरीकामगार युतीचे नेतृत्व शेतकऱ्यांकडे राहू नये, कामगार अल्पसंख्य असले तरी अधिक 'झुंझार' असतात, त्यांच्याके नेतृत्व द्यावे या अहंकारापोटी कामगार नेत्यांनी संयुक्त आघाडी फोडण्याचे हे काही पहिले उदाहरण नाही.

 १९८५ मध्ये कामगार आघाडीबरोबर एकत्र काम करण्याची आणखी एक संधी आली. प्रचंड बहुमतांनी निवडून आलेल्या पंतप्रधान राजीव गांधी यांनी कृत्रिम धाग्यांच्या वस्त्रांना सर्वतोपरी उत्तेजन देण्याचे धोरण जाहीर केले. याउलट, कापसावर मात्र निर्बंध लादून किमती पाडण्यात आल्या. संघटनेने त्याविरुद्ध मोठे आंदोलन छेडले. 'राजीवस्त्रांच्या होळ्यांचे' कार्यक्रम होऊ लागले. पुण्यामध्ये पतितपावनची मंडळी अनेक वर्षे लकडी पुला जवळ विलायती कपड्यांच्या होळीचा वार्षिक कार्यक्रम घेतात. त्यांच्या बरोबरीने आम्ही राजीवस्त्रांची मोठी होळी केली. पुण्यातले 'समाजवादी महर्षी' नाराज झाले. राजीवस्त्रांच्या होळीचा मोठा कार्यक्रम मुंबईत घेण्याचे ठरले. १२ डिसेंबर हा हुतात्मा बांबू गेनूचा स्मृतिदिन. मूळजी जेठा मार्केटातून विलायती कापडांचा ट्रक बाहेर पडत

अंगारमळा । ९९